पुणे |प्रतिनिधी| Pune
टीईटी परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता शिक्षण विभागाने बनावट प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळवलेल्यांचा शोध सुरु केला आहे. त्यामुळे आता शिक्षकांच्या ‘टीईटी’ प्रमाणपत्राची पडताळणी होणार आहे. राज्य परीक्षा परिषदेचे शिक्षण उपसंचालक यांनी तसे शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. यामुळे आता बोगस शिक्षकांचा पर्दाफाश होणार आहे.
राज्यात 13 फेब्रुवारी 2013 नंतर नियुक्त झालेल्या पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीच्या शिक्षकांच्या टीईटी उत्तीर्ण प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.
टीईटी परीक्षेत गैरव्यवहार झाल्याची माहिती पुढे आली होती. तसेच हा गैरव्यवहार उघड झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे पडताळणीतून बनावट प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळवलेल्या शिक्षकांचा शोध लागण्याची शक्यता आहे. सध्या सहाशे प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचे काम सुरू आहे. उर्वरित शिक्षकांच्या प्रमाणपत्राची पडताळणी आता करण्यात येईल. त्यामुळे बोगस प्रमाणपत्राच्या माध्यमातून नोकरी मिळवल्यांच्या नोकरीवर गदा येणार आहे.