मुंबई | Mumbai
आगामी स्थानिक मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC Election) तोंडावर शिंदे-भाजप सरकारला मोठा धक्का बसला आहे. मुंबई महापालिकेच्या २०१७ च्या प्रभाग रचनेप्रमाणेच महापालिका निवडणुका घेण्याच्या शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
शिंदे-फडणवीस सरकारच्या वॉर्ड रचना २०१७ च्या प्रभाग रचनेप्रमाणे ठेवण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले होते. त्यावर आज सुनावणी झाली असता, सर्वोच्च न्यायालयाने शिंदे-फडणवीसांचा निर्णय रद्द केला आहे. तसेच मुंबई महापालिकेतील वॉर्ड पुनर्रचना जैसे थे ठेवण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी तीन सदस्यीय प्रभागरचना करण्यात आली होती. मात्र राज्यात सत्ताबदल झाल्यावर शिंदे- फडणवीस सरकारने तो निर्णय रद्द करून २०१७ च्या धर्तीवर प्रभाग रचना करण्याचा निर्णय घेतला. यामुळे राज्यातील महापालिकांमधे पुन्हा चार सदस्यीय प्रभाग रचना लागू होणार आहे.