मुंबई | Mumbai
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक सध्या जोरदार चर्चेत आहे. प्रामुख्याने विरोधी पक्षांनी एकमेकांवर केलेल्या आरोपापेक्षा ही निवडणूक एकाच पक्षातील दोन गटांमुळे आणि उमेदवारावरुन अधिक चर्चेत आली आहे. निमित्त ठरले आहे मुंबई महापालिका कर्मचारी ऋतुजा लटके यांचा राजीनामा.
दरम्यान ऋतुजा लटकेंचा राजीनामा मुंबई महापालिकेकडून मंजूर करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाने कान टोचल्यानंतर अखेर मुंबई महानगरपालिकेने ऋतुजा लटके यांना राजीनाम्याचे पत्र सुपूर्द केले. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही आपला राजीनामा स्वीकारत आहोत, असे महापालिकेने पत्रात नमूद केले आहे.
यानंतर ऋतुजा लटके यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना टोला लगावला. राजीनाम्यासाठी संघर्ष करण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती. मी इतकी वर्षे पालिकेत लिपीक म्हणून काम केले. पण राजीनाम्यासारख्या गोष्टी आयुक्तांपर्यंत नेल्या जातात, याचेच मला आश्चर्य वाटते, अशी खोचक टिप्पणी ऋतुजा लटके यांनी केली.