Thursday, April 25, 2024
Homeनगरशेतकर्‍यांची लूट थांबवा अन्यथा तीव्र आंदोलन

शेतकर्‍यांची लूट थांबवा अन्यथा तीव्र आंदोलन

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

युरीया खताच्या खरेदीसाठी इतर औषधांची सक्ती शेतकर्‍यांना करून लूट केली जात आहे. याची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर तातडीने कारवाई करून केंद्र व राज्य सरकारची बदनामी थांबवावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाच्यावतीने प्रांताधिकार्‍यांकडे करण्यात आली. औषधांची सक्ती न थांबल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिष्टमंडळाच्यावतीने देण्यात आला.

- Advertisement -

सध्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांची पेरणीची कामे सुरू आहेत. हंगामाच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने खताची उपलब्धता करून दिलेली आहेत. मात्र युरीया खताची खरेदी करताना संगमनेर शेतकी सहकारी संघातून तसेच काही दुकानदार आवश्यक नसलेल्या औषधांची सक्ती शेतकर्‍यांवर करीत आहेत. यामुळे शेतकर्‍यांची एकप्रकारे लूट होत असल्याची भावना व्यक्त होत असून,औषध घेतले तरच युरीया खत मिळेल, असे सांगण्यात येते. युरीया खत सरकारने उपलब्ध करून न दिल्याचा संभ्रम निर्माण करून दिला जात असल्याच्या अनेक तक्रारी शेतकर्‍यांनी किसान मोर्चाच्या पदाधिकार्‍यांना भेटून निदर्शनास आणून दिल्या आहेत.

किसान मोर्चाच्या शिष्टमंडळाने आज प्रांताधिकारी शैलेश हिंगे तसेच उपविभागीय कृषी अधिकारी विलास गायकवाड यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन सादर केले. शेतकी सहकारी संघ तसेच काही दुकानांमधून युरीया खत हवे असल्यास जाणिवपूर्वक इतरही औषधं खरेदी करण्याची सक्ती करून एक प्रकारे शेतकर्‍यांची अडवणूक केली जात आहे. वास्तविक खताची उपलब्धता असतानाही शेतकर्‍यांना खत उपलब्ध करून न देणे ही एकप्रकारे शेतकर्‍यांची अडवणूक असून, केंद्र आणि राज्य सरकारलाच बदनाम करण्यासारखे आहे. या घटनेची प्रशासनाने गंभिर दखल घेऊन शेतकर्‍यांवर होणार्‍या औषधांची सक्ती तातडीने थांबवावी, अशी मागणी शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केली आहे.

याप्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष सतीश कानवडे, किसान मोर्चाचे प्रदेश सदस्य रवींद्र थोरात, अमोल खताळ, अशोक कानवडे, रोहिदास साबळे, संजय मोरे, संदीप क्षीरसागर, अशोक नन्नवरे, सुयोग गुंजाळ, संदेश देशमुख संजय पावसे यांच्यासह शेतकरी आणि पदाधिकारी उपस्थित होते.

हा प्रश्न केवळ संगमनेर तालुक्यापुरता मर्यादित नसून संपूर्ण राज्यासाठी आहे. खत कंपनीकडून लिंकिंग प्रोडक्ट घेतल्याशिवाय शेतकर्‍यांसाठी युरिया खत मिळत नाही आणि जर लिंकिंग प्रोडक्ट घेतले नाही तर शेतकर्‍यांसाठी युरिया उपलब्ध होणार नाही.संगमनेर शेतकी संघाने कायम शेतकर्‍यांच्या मदतीची भूमिका घेतली असून शेतकर्‍यांची गैरसोय होऊ नये, यासाठी सातत्याने गुणवत्तापूर्वक काम केले आहे. शिवाय संघ युरिया खताबरोबर शेतकर्‍यांना लिंकिंग प्रोडक्ट घ्यावे, असे बंधनकारक करत नाही.

अनिल थोरात, व्यवस्थापक, संगमनेर शेतकी संघ

- Advertisment -

ताज्या बातम्या