आघाडी विरुद्ध भाजप सामना

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक l Nashik (कुंदन राजपूत)

बंगालसह पाच राज्यांच्या निवडणुकीत अवघा देश रंगला असून राजकीय पक्षांकडून रोज नवनवीन रंगाची उधळण होत आहे.

मात्र, महाराष्ट्रात मागील दीड वर्षांपासून रोज राजकीय धूळवड खेळली जात आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी जोरदार चिखलफेक चालू असून ‘बुरा न मानो होली है’ असे म्हणत या राजकीय धूळवडीने तमाम मराठी जनतेचे मनोरंजन सुरू आहे.

मागील विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप व शिवसेनेने युती करत ‘आमचं ठरलंय’ ही टॅग लाईन घेत विरोधकांना निकालाच्या आकड्यात धोबीपछाड दिला. त्यानंतर मात्र मुख्यमंत्रीपदावरुन या दोन्ही मित्र पक्षाचे फाटले. त्यानंतर पुढील काळात महाराष्ट्राच्या राजकारणात जी काही राजकीय शिमगा व धूळवड सुरू झाली ती आजतगायत कायम सुरुच आहे.

विधानसभेच्या आत असो की बाहेर रोज महाविकास आघाडी विरुध्द भाजप असा सामना रंगत असून आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवत दोन्ही बाजूने जोरदार चिखलफेक केली जात आहे. त्यात सुशांतसिंग आत्महत्या प्रकरण, सेलिब्रेटी ड्रग्ज सेवन चौकशी, वेणू-रेणू प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंचा ‘सामाजिक न्याय’, वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा या सर्व प्रकरणाचे रोज नवनवे रंग बाहेर आले व त्यावरुन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्ष ‘मी पुन्हा येईल’ असा सूर आवळत महाविकास आघाडीविरुद्ध शिमगा केला.

हे थोडेफार की त्यात वाझेंचा प्रकरणावरुन विरोधकांनी डिटेक्टिव्ह सारखे पुरावे गोळा करत महाविकास आघाडीला सळो की पळो केले.

वाझे प्रकरणावरुन सरकारचे अगदी भजे झाले. हे कमी की काय त्यात पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांच्या लेटर बॉम्बवरुन जोरदार धूळवड उडाली. एकूणच विरोधी पक्षनेते फडणवीस, शिवसेना मुलुख मैदान तोफ संजय राऊत यांच्या विधानांनी तर दिल्लीपर्यंत ही धूळवड खेळली गेली.

मागील दीड वर्षापासून सुरू असलेल्या या धूळवडीत मुख्यमंत्रांच्या बंगला वर्षा असो की राज्यपालाचे निवासस्थान राजभवन, सर्व जण एकच रंगात रंगून गेले. पण ‘दाग अच्छे है’ म्हणत ही धूळवड पुढे देखील सुरू राहणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *