Saturday, April 27, 2024
Homeजळगावभुसावळच्या अमृत योजनेला नवसंजीवनी

भुसावळच्या अमृत योजनेला नवसंजीवनी

भुसावळ – Bhusawal – प्रतिनिधी :

शहरातील सध्या अडगळीत पडलेल्या तसेच मुदत संपूनही पूर्णत्वाला न आलेल्या अमृत योजनेला पालकमंंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठबळाने नवसंजीवनी मिळणार आहे.

- Advertisement -

मूळ 90 कोटींच्या या योजनेच्या 158 कोटी रूपयांच्या नवीन सुधारित आराखड्याला मंजुरी देणार असल्याची माहिती दि. 31 रोजी पालकमंत्री आढावा बैठकीत दिली. यामुळे शहराच्या विकासाचे नवीन पर्व सुरू होणार आहे.

याबाबत वृत्त असे की, शहरात अमृत योजनेचे काम अपूर्ण असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे शहरातील रस्त्यांवर खड्डयांचे साम्राज्य असून नागरिकांना वेळेवर पाणी पुरवठा देखील करण्यात येत नाही.

या समस्येची गंभीर दखल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतली आहे. या अनुषंगाने त्यांनी दि. 31 रोजी जळगाव येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात आढावा बैठकीचे आयोजन केले होते. यात या योजनेच्या कार्यान्वयबाबत सविस्तर उहापोह करण्यात आला.

शहरात 22 मे 2017 रोजी 90 कोटी, 84 लाख 51 हजार रूपयांच्या अमृत योजनेला मान्यता देण्यात आली. यानंतर 26 रोजी मे. जैन इरिगेशन सिस्टीफ लिमिटेड, जळगाव या कंपनीला वर्क ऑर्डर देण्यात आली.

या योजनेची मुदत दोन वर्षांची असली तरी मुदत संपून एक वर्ष उलटले तरी अद्याप याचे काम पूर्णत्वाकडे आलेले नाही. यात योजनेतील 213 किलोमीटरपैकी 140 किलोमीटरच्या पाईपलाईनचे काम झालेले आहे. तर पाण्याच्या 11 टाक्यांपैकी, 9 टाक्यांचे काम सुरू झालेले आहे.

शहरातील पाणी पुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर असले तरी कोविड-19 चा प्रादूर्भाव आणि नंतर पावसाळ्यामुळे वितरण व्यवस्था व रस्त्यांची कामे खोळंबली आहेत. याआधी पाण्याचा स्त्रोत हा शहरातील तापी नदीच्या पात्रात होता.

हा स्त्रोत बदलून शेळगाव बंधार्‍याच्या वरील भागात साकेगाव शिवारात घेण्यात आला असून यासाठी मजिप्रा नाशिक येथे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमिवर, आजच्या बैठकीत मजिप्रातर्फे 90 कोटी ऐवजी सुधारित 158 कोटी रूपयांचा नवीन प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. अमृतच्यामूळ योजनेचे काम येत्या मार्च अखेरीस पूर्णत्वाकडे येऊन नंतर सुधारित काफास प्रारंभ करण्यात येईल असे या बैठकीत ठरविण्यात आले.

यात जानेवारी 2021 पर्यंत वितरण व्यवस्थेचे काम पूर्ण करावे आणि 8 जलकुंभ हे मार्च 2021 तर तीन जलकुंभ हे जुलै 2021 अखेरीस पूर्ण करावे असे निर्देश जैन इरिगेशनला या बैठकीत देण्यात आले. परिणामी अमृत योजनेला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठबळाने व आ. संजय सावकारे यांच्या पुढाकाराने नवसंजीवनी मिळणार आहे.

या बैठकीला आ. संजय सावकारे, आ. अनिल पाटील, नगरसेवक मनोज बियाणी, मजिप्राचे अभियंता निकम, भुसावळचे मुख्याधिकारी संदीप चंद्रवार, प्रकल्प अभियंता वाघ, जैन इरिगेशनचे अधिकारी भिरूड, ललवाणी आदींची उपस्थिती होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या