अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या भोयरे पठार आणि आरणगाव ग्रामपंचायतीस पिण्याच्या पाण्याची चणचण जाणवत आहे. विशेषतः नगर शहरापासून केवळ पंधरा किलोमीटरच्या अंतरावर ग्रामपंचायत आहे. याप्रश्नी डॉ.खा. सुजय विखे पाटील यांनी लक्ष घालून पाठपुरावा केला. त्यास यश आले असून यामुळे या दोन्ही गावांना आता सुपा एमआयडीसीच्या पाणी योजनेतून पाणी मिळणार आहे.
या दोन्ही ग्रामपंचायतींनी लोकवर्गणीतून पाईपलाईन टाकण्याचे व मोटार बसवण्याची सुद्धा तयारी होती. मात्र, खात्रीशीर पाणीपुरवठा नसल्याने अनेक वर्षांपासून ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जशास तसा होता. टाकी बांधून, मोटर बसवण्याची तयारी सुद्धा ग्रामपंचायतीची होती.
मात्र, पाणी उपलब्ध नसल्यामुळे गावातील महिलांच्या डोक्यावरचा हंडा काही जात नव्हता. सुपा एमआयडीसीतील उद्योगांसाठी मुळा धरणातून लाखो लिटर पाणी डोळ्यादेखत जात असताना भोयरे पठार ग्रामपंचायतीस मात्र पाण्यापासून वंचित राहावे लागत होते. 7 फेब्रुवारी रोजी एमआयडीसी करिता जाणार्या पाण्यातून ग्रामपंचायतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्याचे साकडे ग्रामस्थांनी खा. डॉ. विखे यांना घातले.
त्यांनी तात्काळ दखल घेऊन महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाच्या मॅनेजिंग डायरेक्टर यांच्याशी थेट संपर्क करून महामंडळाच्या जलशुद्धीकरण केंद्रातून सुपा औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करणार्या पाईपलाईनमधून या गावांना पाण्याची मागणी केली. यास यश आले असल्याने आता दोन्ही गावांना पिण्याचे पाणी मिळणार आहे.