Wednesday, April 24, 2024
Homeभविष्यवेधअंगठ्यांच्या परिधानाचे शुभ फळ

अंगठ्यांच्या परिधानाचे शुभ फळ

भारतात अनेक प्रकारची अनमोल रत्ने आढळतात. रत्नांचा आकार, वैविध्य, वैशिष्ट्य यांवरून त्याचे वेगळेपणे सिद्ध होत असते. जीवन सुसह्य, सुखमय, समृद्ध होण्यासाठी माणूस नेहमी धडपडत असतो. मेहनत, परिश्रम यांच्या जोरावर यश व प्रगती साध्य करत असतात. काही जण कष्ट करत असतात.

मात्र, अपेक्षित परिणाम साध्य होत नसल्यास ज्योतिषशास्त्राचा आधार घेतात. भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये ज्योतिषशास्त्राला प्राचीन काळापासून महत्त्व असल्याचे दिसून येते. कुंडलीचा अभ्यास केल्यानंतर काही जणांना एखादी अंगठी परिधान करण्याचा सल्ला दिला जातो.

- Advertisement -

ज्योतिषशास्त्रानुसार, काही अंगठ्या परिधान करणे अत्यंत शुभ मानले जाते. या अंगठ्या धारण केल्याने आर्थिक स्थितीत सुधारणा होते. तसेच आरोग्यही उत्तम राहत, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. याशिवाय कुंडलीतील काही ग्रह-नक्षत्र कमकुवत असतील, तर त्यांची स्थिती सुधारण्यासाठीही या अंगठ्या सहाय्यभूत ठरतात. नेमक्या कोणत्या अंगठ्या परिधान करणे शुभ मानले जाते? जाणून घेऊया…

कासवाची अंगठी

शास्त्रांनुसार, कासवाला लक्ष्मीचे म्हणजेच धनाचे प्रतीक मानले गेले आहे. तसेच याचा संबंध श्रीविष्णूंनी धारण केलेल्या कूर्म अवताराशी निगडीत असल्याचे सांगितले जाते. लक्ष्मी देवीसोबत कासवाला धनवृद्धीकारक मानले जाते.

कासव धैर्य, शांती, निरंतरता, सातत्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. कासवाची अंगठी धारण केल्याने जीवनात सुखद बदल घडून यायला सुरुवात होते. ही अंगठी परिधान केल्यास आर्थिक संपन्नता येते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

कासवाची अंगठी उजव्या हाताच्या पहिल्या किंवा मधल्या बोटामध्ये घालण्याचा सल्ला दिला जातो. अंगठी धारण करण्याची विशिष्ठ पद्धत असून, त्यानुसारच ती धारण करावी. जीवनात स्थैर्य, शांतता, संयम, सुख, समृद्धी कायम राहण्यास मदत मिळते, असे सांगितले जाते.

सर्पाकार अंगठी

कासवाच्या अंगठीप्रमाणे सापाच्या आकारासारखी अंगठी परिधान करणे शुभ मानले गेले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, ज्या व्यक्तींच्या कुंडलीत कालसर्प योग वा दोष, पितृदोष आणि ग्रहण दोष असेल, अशा व्यक्तींना सर्पाकार अंगठी परिधान करण्याचा सल्ला दिला जातो.

असे केल्याने कालसर्प योग वा दोष, पितृदोष आणि ग्रहण दोष दूर होण्यास मदत मिळते, असे म्हटले जाते. याशिवाय सर्प मुद्रिका परिधान केल्याने आरोग्य, सुख, समृद्ध प्राप्त होऊ शकते. नकारात्मक विचार, शक्ती यांपासून संरक्षण मिळते.

तसेच धनसंपदाही वृद्धिंगत होऊ शकते, अशी मान्यता असल्याचे म्हटले जाते. मात्र, तज्ज्ञ आणि जाणकाराच्या योग्य सल्ल्यानंतरच अंगठी परिधान करावी, असे सांगितले जाते.

नीलम अंगठी

नवग्रहांमध्ये न्यायाची देवता असलेल्या शनी महाराजांचे चमत्कारिक रत्न म्हणून नीलम ओळखले जाते. नीलम हे रत्न प्रामुख्याने निळ्या रंगात आढळून येते. नीलम परिधान करणे शुभ मानले जाते. राजाला रंक आणि रंकाला राजा बनवण्याची ताकद नीलम रत्नात आहे, अशी मान्यता आहे. नीलम रत्नाची अंगठी परिधान केल्याने नकारात्मक परिणाम दूर होतात. सकारात्मकता संचारते. ग्रह-नक्षत्रांचे अनुकूल परिणाम दिसू लागतात. धन-धान्य, मान-सन्मान वृद्धिंगत होते. करिअरमध्ये यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतात. नीलम रत्न पंचधातूच्या अंगठीत शनिवारी शनीच्या दिशेला मुख करून परिधान करावी, असे सांगितले जाते.

नवग्रहांची अंगठी

तांबा, चांदी, सोने, लोखंड, कांस्य, पितळ आदींपासून नवग्रहांची अंगठी तयार केली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रहांची अंगठी परिधान करणे शुभ मानले जाते. सुख, समृद्धीसह मानसिक शांतता, तणावविरहीत जीवनासाठी नवग्रहांची अंगठी उपयुक्त मानली गेली आहे. तसेच ग्रह-नक्षत्रांचे अनुकूल परिणाम प्राप्त होऊ शकतात. कामे जलदगतीने पूर्ण होण्यास मदत मिळते. ही अंगठी धारण केल्यास नकारात्मकता दूर होते. मात्र, तज्ज्ञ आणि जाणकाराच्या योग्य सल्ल्यानंतरच अंगठी परिधान करावी, असे सांगितले जाते.

त्रिशुल अंगठी

ज्योतिषशास्त्रानुसार, त्रिशुळ अंगठी धारण केल्याने महादेव शिवशंकरांची कृपा आणि शुभाशिर्वाद प्राप्त होतात. तसेच शनीदोषाचा प्रभाव कमी होण्यास मदत मिळते, असे म्हटले जाते. त्रिशुल अंगठी परिधान केल्यानंतर आरोग्यात सुधारणा दिसून येऊ शकते. सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. हितशत्रूंपासून सुरक्षा कवच निर्माण होते. त्रिशुळ हे शिवासह शक्तीचेही प्रतीक मानले जाते. यामुळे दुर्गादेवीचे आशिर्वादही प्राप्त होतात. द्रुष्ट लागण्यापासून बचाव होतो, असे अनेक फायदे त्रिशुळ अंगठीचे सांगितले जातात. मात्र, तज्ज्ञ आणि जाणकाराच्या योग्य सल्ल्यानंतरच अंगठी परिधान करावी, असे म्हटले जाते.

- Advertisment -

ताज्या बातम्या