Thursday, April 25, 2024
Homeभविष्यवेधज्योतिषशास्त्राच्या पल्याड

ज्योतिषशास्त्राच्या पल्याड

ज्योतिषशास्त्र हे एक विज्ञान नाही. तर ही एक प्रकारची सांकेतिक भाषा आहे. विशिष्ट संकेत वाचून, लोक विशिष्ट प्रकारचे भविष्य वर्तवू शकतात परंतु हे कधीही 100 टक्के तंतोतंत नसते.

विशिष्ट संकेतांच्या आधारे तुम्ही अंदाज लावता की भविष्य एका विशिष्ट मार्गाने जाईल. तुम्ही जर अतिशय अजाणपणे जीवन जगलात तर कदाचित त्या मार्गाने जाऊ शकाल परंतु तुम्ही जर जरा अधिक सजग झालात तर तुम्ही तुमचे आयुष्य तुमच्या इच्छेनुसार जगू शकाल. कोणतेही ग्रह-मग तो मंगळ असो, शुक्र किंवा आणखी कोणताही असो, ते फक्त एक निर्जीव ग्रह आहेत.

- Advertisement -

निर्जीव गोष्टींनी आपल्या जीवनाचा मार्ग ठरवता कामा नये. मानवी स्वरूप निर्जीव वस्तूंपेक्षा जास्त महत्त्वपूर्ण आणि शक्तिशाली आहे, नाही का ?

जर तुमचे मानवी स्वरूप सक्रिय असेल तर निर्जीव गोष्टी तुमच्यावर प्रभाव टाकू शकत नाहीत.

जर तुमचे मानवी स्वरूप झोपी गेले असेल आणि तुम्ही फक्त एखाद्या निर्जीव भौतिक गोष्टीप्रमाणे जीवन जगत असाल तर ग्रहांचा तुमच्यावर काही प्रभाव पडू शकतो.

तुम्हाला हे माहिती आहे का, की ज्या व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्थिर असतात, किंवा मनाने कमकुवत असतात, त्या व्यक्तींचे मानसिक संतुलन पौर्णिमा आणि अमावस्येच्या रात्री अधिकच ढळते किंवा ते अधिकच असंतुलित होतात ? पौर्णिमेच्या रात्री इतर सर्वजणसुद्धा वेडे होतात का ? नाही, कारण त्या व्यक्तीच्या तुलनेत तुम्ही थोडे अधिक स्थिर आहात.

आणि तुम्ही स्थिर असल्याने, चंद्र कोठेही गेला तरी तुम्हाला काही फरक पडत नाही; तुम्ही तीच व्यक्ती राहता.

मूलभूतरित्या चंद्राचा तुमच्या जीवनावर प्रभाव असतो परंतु तुमच्या तो लक्षात येत नाही कारण तुम्ही मानसिकदृष्ट्या स्थिर आहात. त्याचप्रमाणे तुम्ही जर अधिक प्रमाणात स्थिर झालात, तर कोणत्याही ग्रहाला हवे तिथे जाऊ द्या, तुम्ही मात्र तुम्हाला जिथे जायचे आहे तिथेच जाल.

तुम्ही इतके स्थिर नसाल तर तुम्हाला अनेक वस्तूंद्वारे ओढले आणि ढकलले जाऊ शकते. प्रत्येक वस्तूचा तुमच्यावर प्रभाव असतो कारण प्रत्येक वस्तूला स्वतःचं असं एक स्पंदन असतं.

निर्जीव वस्तूंना मानवी जीवनाचा मार्ग ठरवू देऊ नका. मानवी स्वरूप त्यापेक्षा खूपच अधिक काहीतरी आहे. केवळ माणूस असणे म्हणजे किती प्रचंड मोठी गोष्ट आहे याचा अर्थ लोकांना कळलेला नाही म्हणूनच लोक सतत देव, स्वर्ग, ग्रह आणि या अशा सर्व गोष्टींबद्दल बोलत असतात.

मानवी स्वरूप जर आधीच लिहून ठेवले गेले तर ती विटंबना आहे. माणसाने जर एखादी गोष्ट निश्चित केली, तर या अस्तित्वातील कोणतीही शक्ती त्याला त्या गोष्टीकडे जाण्यापासून रोखू शकत नाही, विशेषत: जेव्हा ती गोष्ट त्याच्या आंतरिक पैलूची असेल तेव्हा; अस्तित्वात असणारे असे काहीही नाही जे आपल्याला थांबवू शकेल.

तुमचे ध्येय निश्चित असेल, तर स्वतः देव जरी तुम्हाला रोखू इच्छित असेल तरी तो तुम्हाला रोखू शकत नाही.

आत्ता जर तुम्ही तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करायला तयार असाल, तुम्ही जर या क्षणी निर्णय घेतला असेल की मी आनंदी होईन, तर देव तुम्हाला थांबवू शकेल काय ? नाही.

या विश्वातील कोणती गोष्ट तुम्हाला रोखू शकत नाही. ग्रह कुठे जात आहेत याची पर्वा न करता तुम्ही तुमच्या जीवनाचा मार्ग निश्चित करू शकता.

(जागतिक पातळीवर नावाजलेले द्रष्टे योगी, आत्मज्ञानी आणि प्रसिद्ध लेखक असा लौकिक असलेले सद्गुरु हे भारतातील पहिल्या 50 प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आहेत. सद्गुरूंना भारत सरकारने 2017 मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने गौरविले आहे.)

- Advertisment -

ताज्या बातम्या