भंडारदरा-निळवंडेचे ओव्हरफ्लोचे पाणी कालव्याव्दारे चार्‍यांना सोडावे

jalgaon-digital
1 Min Read

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

भंडारदरा धरणातून सध्या ओव्हरफ्लोचे पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. लाभक्षेत्रात अपुरा पाऊस असल्याने खरिपांच्या पिकांना पाण्याची गरज आहे. त्यामुळे ओव्हर फ्लोचे पाणी कालव्याव्दारे चार्‍यांना सोडावे, अशी मागणी अशोक कारखान्याचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक कोंडीराम उंडे यांनी केली आहे.

श्री. उंडे यांनी म्हटले आहे की, भंडारदरा व निळवंडे दोन्ही धरणे भरली आहेत. जायकवाडी धरणही पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे भंडारदरा व निळवंडेचे ओव्हरफ्लोचे पाणी अनेक दिवसांपासून नदीपात्रात सोडले जात आहे. धरणे भरली असली तरी लाभक्षेत्रात मात्र समाधानकारक पाऊस नाही. विहिरींच्या पाणी पातळीतही वाढ झालेली नाही. तसेच खरिपाच्या पिकांनाही पाण्याची गरज आहे.

अशी वस्तुस्थिती असल्याने नदीपात्राबरोबरच कालव्याव्दारे लाभक्षेत्रातील चार्‍यांना पाणी सोडावे. जेणेकरुन पिकांची गरज भागेल तसेच विहिरी, कुपनलिकांच्या पाणी पातळीतही वाढ होण्यास मदत होईल. तरी यासंदर्भात पाटबंधारे विभागाने तातडीने निर्णय घेऊन शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी मागणी श्री. उंडे यांनी केली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *