अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
जिल्ह्यात नव्याने 469 स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने तालुकानिहाय उद्दिष्ट ठरवून संबंधीत तालुक्यातील ग्रामपंचायतींकडून या हवामान केंद्राच्या जागांचे प्रस्ताव मागवले आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक नवीन स्वयंचलित हवामान केंद्र संगमनेर तालुक्यात 50 ग्रामपंचायतीमध्ये तर नगर, पारनेर आणि अकोले तालुक्यात प्रत्येकी 43, तसेच नेवासा आणि श्रीगोंदा तालुक्यात प्रत्येकी 39 ग्रामपंचायतींमध्ये हे नवीन केंद्र उभारण्यात येणार आहेत.
राज्यातील 10 हजार ग्रामपंचायतीच्या हद्दीत स्वयंचलित हवामान केद्र उभारणीसाठी आयएमडी (भारतीय हवामान विभाग) यांच्या निकषानूसार जागा निश्चित करण्याचे आदेश प्रत्येक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी यांना दिले होते. यात नगर जिल्ह्यात 469 ग्रामपंचायतीमध्ये नवीन स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी करण्याचे उद्दिष्ट कृषी आयुक्तालयाकडून पाठवण्यात आले होते.
जिल्हा परिषद कृषी विभागाने जिल्ह्यातील 14 तालुक्यात असणार्या हवामान केंद्राची उपलब्धता हे पाहून नव्याने 469 गावातील नवीन केंद्र उभारणी उद्दिष्ट निश्चित केले आहे. नव्याने उभारण्यात येणार्या स्वयंचलित हवामान केंद्रासाठीचे निकष भारतीय हवामान विभागाने ठरवून दिलेले आहेत. यात संबंधीत गावातील जागा, तपासण, जागेची भौगोलिक स्थिती याचे मानाकंने ठरवून दिलेले आहेत. त्यानूसार निवड झालेल्या गावातील जागा उपलब्ध करावी लागणार आहेत.
या ठिकाणी राहणार नवीन केंद्र
संगमनेर तालुक्यात 50 ग्रामपंचायतीमध्ये तर नगर आणि अकोले तालुक्यात प्रत्येकी 43, तसेच नेवासा आणि श्रीगोंदा तालुक्यात प्रत्येकी 39, राहुरी 29, कोपरगाव 21, राहाता 21, तामखेड 25, कर्जत 37, श्रीरामपूर 18, पाथर्डी 32, शेवगाव 29 यांचा समावेश आहे.