दिल्ली | Delhi
करोनाचा भारतातील कहर कमी होताना दिसत नाही. करोनाच्या दुसऱ्या लाटेनं जेरीस आणलं असून, प्रचंड वेगानं संक्रमण होत आहे.
देशातील करोनाबाधितांच्या संख्येसोबतच करोनामुळे मृत्यु होणाऱ्यांची संख्या देखील वाढू लागली आहे. भारतात करोनाची वाढती रुग्णसंख्या पाहाता अनेक देशांनी भारतात येण्यापासून आणि भारतातून येण्यापासून त्यांच्या नागरिकांना बंदी घातली आहे.
या पार्श्वभूमीवर आता ऑस्ट्रेलियानं देखील कठोर निर्णय घेतला आहे. भारतातून ऑस्टेलियाला जाणारी सर्व प्रवासी विमानं रद्द करण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन (Scott Morrison) यांनी घेतला. ‘१५ मे पर्यंत विमानांवर असलेली ही बंदी कायम राहणार आहे. भारतातून येणाऱ्या नागरिकांमध्ये करोनाचा धोका वाढू शकतो म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे’, असं स्कॉट मॉरिसन यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान भारतात गेल्या २४ तासात तब्बल ३ लाख २३ हजार १४४ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील एकूण रुग्ण संख्या १ कोटी ७६ लाख ३६ हजार ३०७ इतकी झाली आहे. तसेच गेल्या २४ तासात २ लाख ५१ हजार ८२७ जण उपचारानंतर बरे झाले असून २ हजार ७७१ जणांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत १ कोटी ४५ लाख ५६ हजार २०९ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात सक्रिय रुग्नांची संख्या २८ लाख ८२ हजार २०४ इतकी झाली असून मृतांची संख्या १ लाख ९७ हजार ८९४ इतकी झाली आहे. तसेच देशात आतापर्यंत १४ कोटी ५२ लाख ७१ हजार १८६ जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे.