पंढरपूर | Pandharpur
आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) निमित्त मंगळवारी पहाटे श्री विठ्ठल – रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्या हस्ते करण्यात आली.
पहाटे सव्वा दोन वाजल्यापासून या महापुजेला सुरुवात झाली होती. दरवेळेस मुख्यमंत्र्यांसोबत एका वारकऱ्याला या महापुजेचा मान मिळतो. मात्र यंदा वारीच नसल्याने हा मान विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील विणेकरी मूळचे वर्धा येथील केशव शिवदास कोलते यांना हा मान मिळाला होता.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे यांच्या समवेत वर्धा येथील केशव शिवदास कोलते व त्यांची पत्नी इंदूबाई केशव कोलते यांना यंदा विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मान मिळाला. आजच्या या महापुजेला मुख्यमंत्र्यांसोबतच सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे देखील उपस्थित होते. तसेच पर्यावरण मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे, शिवसेना पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर हे देखील यावेळी मंदिरात हजर होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, पुन्हा एकदा सर्वांना आनंदी आणि निरोगी आयुष्य जगू दे. करोनाच्या काळात नागरिकांच्यावतीने पाळण्यात येणारे सामाजिक मिटवू दे, वारकऱ्यांनी तुडूंब,आनंददायी, भगव्या पताक्यांनी भरलेलं पंढरपूर पहावयाचे आहे, असेही मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले.आज मंदिरात मी वृक्षारोपण केले. हा परंपरेचा वृक्ष असून याची पाळेमुळे जगभरात आणखी घट्ट होतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
आषाढी एकादशीच्या महापूजेनिमित्त संपूर्ण मंदिर फुलांनी सजविण्यात आले होते. तसेच मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. विद्युत रोषणाईने विठ्ठल मंदिर परिसर उजळून निघाले होते.
लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडणारा आषाढी एकादशीचा सोहळा करोनाच्या संकटामुळे यंदा सलग दुसऱ्या वर्षी मोजक्या उपस्थितीत पार पडला. करोनाचं संकट गडद होण्याची भीती असल्याने सरकारने यंदाही पायी वारीला परवानगी नाकारली होती; मात्र प्रतिनिधीक स्वरूपात मानाच्या दहा दिंड्यांना परवानगी देण्यात आली होती. पुष्पांनी सजलेल्या शिवशाही बसेसमधून संतांच्या पालख्या भूवैकुंठी दाखल झाल्या होत्या.