Wednesday, April 24, 2024
Homeब्लॉगकृत्रिम बुद्धिमत्तेच्या धोक्याचा घंटानाद

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या धोक्याचा घंटानाद

सध्या कृत्रिम प्रज्ञा मानवाच्या सामान्य ज्ञानाची भूक भागवत असली तर, येत्या काळात हे तंत्रज्ञान मानवी मेंदूपेक्षाही अधिक वेगाने निर्णय घेऊ शकेल. हे अत्यंत धोकादायक आहे, असे सांगत आर्टिफिशल इंटेलिजन्समध्ये मोलाचे योगदान देणार्‍या जेफ्री हिंटन यांनी ‘गुगल’चा राजीनामा दिला आहे. खुद्द या तंत्रज्ञानाचा गॉडफादर त्याकडे जगाचे लक्ष वेधून घेत असेल तर त्याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता या शब्दाचा वापर सर्वप्रथम 1956 मध्ये न्यू हॅम्पशर राज्यातील डार्टमाऊथ कॉलेजमध्ये झालेल्या एका परिषदेमध्ये झाला. यंत्रमानव म्हणजेच रोबोटची संकल्पना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानावरच आधारलेली आहे. काही वर्षांपूर्वी फेसबुक या सोशल मीडियाच्या क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीमध्ये वापरल्या जाणार्‍या दोन यंत्रमानवांमध्ये एक अनोखा प्रकार घडला. हे दोन यंत्रमानव एकमेकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनी एक नवी भाषा तयार करुन त्यात संभाषण करण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यावेळी यंत्रमानव मानवावर वरचढ ठरणार अशी भीती व्यक्त केली गेली.

शिकण्याची क्षमता असणारे संगणकीय सॉफ्टवेअर म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता असे म्हटले जात असले तरी या शिकण्यातून नव्याने उद्भवलेल्या परिस्थितीत माणसासारखेच निर्णय घेण्याची क्षमता संगणकामध्ये येऊ शकते. यंत्रमानवांना भावना नसतात. मग हा माणसापेक्षा हुशार झालेला भावनाविहीन यंत्रमानव भविष्यात काय करेल याविषयी काहीच सांगता येत नाही. त्यामुळेच आर्टिफिशियल इंटेलिजेन्सविषयी जगभरात चिंतेचा सूर उमटत होता आणि आहे. हिंटन आणि त्यांच्या दोन विद्यार्थ्यांनी ‘एआय’ तंत्रज्ञानाला पायाभूत ठरेल, असे संशोधन केले आहे. मानवी मेंदूच्या संरचनेप्रमाणे अल्गोरिदमचे जाळे तयार करून संगणकाला ‘डीप लर्निंग’साठी सक्षम बनवणार्‍या संशोधनाचे श्रेय हिंटन यांना जाते. चॅटजीपीटी तंत्रज्ञानाच्या निर्मितीत त्यांच्या संशोधनाचा मोठा वाटा आहे. असे असताना या कामाबाबत खंत व्यक्त करुन त्यांनी या तंत्रज्ञानाच्या संभाव्य धोक्यांकडे लक्ष वेधले आहे. ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे निर्माण होणार्‍या धोक्याचा इशारा देणार्‍या लेखात त्यांनी ‘एआय’ हे समाजविघातक व्यक्तींच्या हातचे खेळणे बनू शकेल, अशी भीती व्यक्त केली आहे. आय सर्व प्रकारचे काम करु शकते. मात्र, जेव्हा एखादे तंत्रज्ञान सर्व प्रकारच्या गोष्टी करु शकते तेव्हा मला काळजी वाटते. कारण या एआयवर नियंत्रण ठेवण्यात आपण अपयशी ठरणार आहोत. त्यामुळे ‘एआय’ हा मानवाच्या अस्तित्वाला अणुबॉम्बसारखा धोका आहे, असे जगप्रसिद्ध अब्जाधीश वॉरेन बफेट यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत सुरुवातीच्या काळात भीती व्यक्त करत असताना काही ठराविक प्रकारच्या नोकर्‍यांवर किंवा अकुशल लोकांवर याचा प्रतिकूल परिणाम होईल असे एक सर्वसामान्य मत होते. पण ‘एआय’चा धोका विशिष्टांना नसून सर्वांनाच आहे, हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. याबाबत सध्या जगभरात गाजत असलेल्या आणि चर्चेत असलेल्या चॅट जीपीटीचे उदाहरण पाहूया. यामध्ये अक्षरशः कुठलाही प्रश्न विचारल्यास त्या क्षेत्रातील तज्ज्ञ जसे उत्तर देईल, जवळपास तशाच प्रकारचे उत्तर मिळू शकते. म्हणजे समजा, एखाद्या डॉक्टरने रुग्णाची कोणतीही तपासणी न करता केवळ सांगितलेल्या लक्षणांवर आधारित काही मत व्यक्त केले, तर तशाच प्रकारचे मत चॅट जीपीटीमधून मिळू शकते. पूर्वी हे ‘गुगल’वर मिळत होते, हे खरे असले तरी चॅट जीपीटीमधून मिळणारे उत्तर असे असते की जणू डॉक्टरच आपल्याशी बोलताहेत ! ही बाब धोकादायक आहे. काळानुसार या सॉफ्टवेअरमधील माहिती जितकी जास्त विश्वासार्ह होत जाईल तितके लोकांचे त्यावर विश्वास ठेवण्याचे प्रमाणही वाढत जाईल. पण त्यावर खरोखरच विसंबून राहण्यासारखी परिस्थिती आहे का, हा प्रश्न उरतोच. कारण ठराविक प्रसंगामध्ये डॉक्टरांचा अनुभव, रुग्णाच्या तपासणीतून आजाराचे निदान करण्याचे कौशल्य आणि उपचारांची दिशा ठरवण्याचे कसब या सर्वांचा त्यामध्ये अभाव असतो. सर्वच क्षेत्रात ही भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे अकुशल किंवा किंचित कौशल्य असणार्‍या लोकांपुरता ‘एआय’चा धोका मर्यादित राहिलेला नसून सगळ्याच प्रकारची कौशल्ये असणार्‍या सगळ्याच लोकांसाठी तो भस्मासूर बनला आहे, यात शंकाच नाही. याबाबत एक गमतीचा भाग लक्षात घ्यायला हवा. चॅट जीपीटी, एआय या सर्वांची निर्मिती सॉफ्टवेअर क्षेत्रातील तज्ज्ञांनीच केली आहे; पण आता ती त्यांच्याही मुळावर उठते की काय अशीही भीती निर्माण झाली आहे. याचे कारण, समजा चॅट जीपीटीला आपण विशिष्ट काम करुन घेण्यासाठीचा प्रोग्राम जावा किंवा पायथन लँग्वेजमध्ये लिहून दे असे सांगितले तर ते जसाच्या तसा प्रोग्राम बिनचूकपणे लिहून देते. असे झाल्यास प्रोग्रॅमर नावाच्या माणसाची गरज कितपत पडेल? केवळ प्रोग्राम लिहून देण्यापर्यंतच नव्हे तर आपण त्यात सांगितलेले-सुचवलेले बदलही चॅट जीपीटी तितक्याच अचूकपणाने करुन देतो.

सर्वांत मोठा धोका आहे तो आकलनक्षमतेवरील परिणामांचा. खास करुन विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेवर याचे प्रचंड दुष्परिणाम होताहेत. मी स्वतः अध्यापन करत असताना याचा अनुभव घेतलेला आहे. पण शालेय-महाविद्यालयीन शिक्षणातून शिकवले जाणारे सर्व काही चॅटजीपीटीवर उपलब्ध असताना आम्ही शिकायचे कशासाठी, असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे. विद्यार्थ्यांना एखादी असाईनमेंट दिल्यास तीही बिनचूकपणाने चॅट जीपीटी सोडवून देऊ शकतो. विद्यार्थ्यांना त्या वयात पदवी घेऊन पुढे जायचे असल्याने यातील धोका लक्षात येत नाही. आधीच करोना काळापासून अभ्यास न करण्याची प्रवृत्ती मुलांमध्ये वाढीस लागली आहे. आता चॅट जीपीटीमुळे ती परमोच्च पातळीकडे सरकू लागली आहे. कारण शिक्षक शिकवतात ते सगळे काही चॅट जीपीटीवर आहे. त्यामुळे आपल्याला गरज भासेल तेव्हा आपण तेथून ते मिळवू. वास्तविक हा दृष्टिकोन पूर्णतः चुकीचा आहे. कारण ज्या चॅटजीपीटीवर विद्यार्थी असाइनमेंटपासून शिकण्यापयर्ंंत विसंबून राहात आहेत, त्यांना उद्याच्या भविष्यात नोकरी देणारे का कामावर घेतील? तेही चॅट जीपीटीकडूनच काम करुन घेणार नाहीत का? त्यामुळे यातून मार्ग कसा काढता येईल यासाठी चॅट जीपीटीला सहजपणाने न जमू शकणारी विश्लेषणात्मक कौशल्ये कशी विकसित करता येतील हे पहावे लागेल. तंत्रज्ञानावरचे हे अवलंबित्व वैचारिक, बौद्धिक पंगुत्वाकडे नेणारे आहे.

सारांशाने सांगायचे झाल्यास, आधुनिक तंत्रज्ञानाच्या अल्लाउद्दीनचा दिवा घासून कृत्रिम बुद्धिमत्तेचा राक्षस आता बाहेर आलेला आहे. त्यामुळे सगळ्याच पातळ्यांवर आता नव्याने विचार करण्याची गरज आहे.

एआयबाबत सिंग्युलॅरिटी अशी एक संकल्पना मांडली जाते. त्यानुसार एक क्षण असा येईल की, एआय हे मानवी बुद्धीपेक्षा जास्त श्रेष्ठ ठरेल किंवा मानवी विचारशक्तीसारखी क्षमता त्यामध्ये विकसित झाली तर तो क्षण खूपच धोकादायक असेल. उद्या त्याचे तोच ठरवून निर्णय घेऊन मोकळा झाला तर ते महाभयंकर ठरेल. स्टीफन हॉकिंग्ज यांनी हा क्षण 2040 च्या दशकात येईल असे भाकित वर्तवले होते. पण आजची एआयची प्रगती पाहता त्यापूर्वीच हे भाकित खरे ठरेल की काय अशी एकंदर परिस्थिती आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या