नाशिक । Nashik
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने ४२६ तज्ज्ञ समुपदेशक आणि ५९६ विषय तज्ज्ञांची नियुक्ती केली आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षा एप्रिलपासून सुरू होत आहेत. करोनामुळे सध्या ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. तसेच, अभ्यासक्रमातही कपात केली आहे. मात्र, सर्वच विद्यार्थ्यांना करोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य पद्धतीने शिक्षण घेता आले नाही, अशा विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण विभागामार्फत समुपदेशन करण्यात येणार आहे.
तसेच, त्यांना अभ्यासात येणाऱ्या अडचणी आणि शंकाचे समाधान करण्यासाठी तज्ज्ञ शिक्षकांकडून प्रश्नोत्तरातून संवाद साधला जाणार आहे. त्यासाठी ५९६ शिक्षकांची नियुक्ती केली आहे. जिल्हानिहाय शिक्षकांची यादी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.