बारावी परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत भरता येईल अर्ज

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक । प्रतिनिधी

राज्य शिक्षण मंडळाची दहावीची परीक्षा रद्द झाली असल्याने शिक्षण मंडळाकडून बारावीच्या परीक्षेवर पूर्णपणे लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये म्हणून विविध प्रकारचे निर्णय घेतले जात आहेत.

त्याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत परीक्षा अर्ज भरण्याची मुभा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र ही मुभा देत असताना शिक्षण मंडळाकडून यासाठी अधिकचे शुल्क विद्यार्थ्यांकडून आकारले जाणार आहे, अशी माहिती मंडळाकडून देण्यात आली.

बारावीच्या मुख्य परीक्षेसाठी राज्य शिक्षण मंडळाकडून नियमित, पुर्नपरीक्षार्थी, श्रेणीसुधार योजनेतील तसेच खासगी विद्यार्थ्यांना अतिविशेष, अतिविलंब परीक्षाशुल्कासह अर्ज भरण्याची मुदत ही 22 एप्रिलपर्यंत देण्यात आली होती. मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर काही विद्यार्थ्यांना हा अर्ज भरता आला नाही तर त्यांनी अधिक शुल्क भरून आपला अर्ज भरावा यासाठी हा निर्णय असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले.

करोना आणि त्यामुळे सुरू करण्यात आलेल्या कडक निर्बंध यामुळे ग्रामीण भागातील अनेक यंत्रणा बंद आहेत. त्यामुळे मंडळाकडून देण्यात आलेल्या मुदतीत काही विद्यार्थ्यांना अर्ज भरता आला नसावा, त्यामुळे विद्यार्थ्यांनी कसलीही चिंता न करता पुढील काळात आपला परीक्षा अर्ज भरावा असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *