त्र्यंबकेश्वर | Trimabkeshwer
यंदा देखील करोनामुळे सणांवर विरजण पडले आहे. गावाकडं प्रसिद्ध असलेल्या चैत्र पौर्णिमेची यात्रा यंदाही रद्द करण्यात आली आहे. येथील अंजनेरी गडावर चैत्र पौर्णिमा साधेपणाने साजरी करण्यात येणार आहे.
येत्या २७ एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमा व हनुमान जयंती आहे. पण यंदा देखील सण उत्सवावर करोनाचे सावट आहे. त्यामुळे भाविकांचा सतत दुसऱ्या वर्षीही हिरमोड झाला आहे. कोविड 19 चे संकट असल्याने उत्सव केवळ घरगुती पद्धतीने होणार आहे.
दरवर्षी अंजनेरी गडावर हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. गेल्यावर्षी कोरोना प्रादुर्भाव सुरू झाल्याने देखील उत्सवावर बंदी होती. त्याचप्रमाणे यंदाही तीच परिस्थिती असल्याने भाविकांच्या आनंदावर विरजण पडले आहे. तसेच बेंझे येथे शिलाई देवी यात्रा देखील होणार नसल्याचे मंदिर समितीने स्पष्ट केले आहे.
अंजनेरी ग्रामपंचायतचे सरपंच, सदस्य व ग्रामसेवक तसेच हनुमान जन्मस्थान समितीचे पदाधिकारी यांनी भाविकांनी अंजनेरी गडावर येऊ नये असे आवाहन केले आहे.