अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
मनपा अस्तित्वात आल्यापासून काँग्रेसला केवळ एकदाच महापौर पदाची संधी मिळाली. ही संधी राष्ट्रवादी, शिवसेनेला अनेक वेळा मिळाली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. राज्यात तिन्ही पक्ष एकत्र आहेत. शीला दीप चव्हाण यांच्या रूपाने काँग्रेसकडे सक्षम उमेदवार आहे. स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसला महापौरपदाची संधी मिळावी, अशी मागणी करत आता काँग्रेसने महापौर पदावर दावा केला आहे.
महापौर निवडणुकीची प्रक्रिया सुरू होत आहे. त्याचे पडघम आता वाजू लागले आहेत. त्यातच शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने अनुसूचित जाती विभागातून पक्षाच्या नगरसेविका असणार्या शीला दीप चव्हाण यांना महापौर करण्याबाबतचा ठराव पक्षीय व्यासपीठावर संमत केला असल्याची माहिती काँग्रेस पक्षाकडून देण्यात आली. महापौरपदासाठी आता काँग्रेसनेही स्थानिक पातळीवर कंबर कसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस भाजपशी सोडचिठ्ठी घेत राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीतील तीनही पक्ष नगर मनपामध्ये एकत्र येणार का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान शीला चव्हाण यांच्या रूपाने काँग्रेसकडे सक्षम आणि अनुभवी उमेदवार आहे. यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची लवकरच भेट घेऊन महापौर निवडणुकीबाबत चर्चा केली जाईल, असे काँग्रेसकडून सांगण्यात आले.