जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :
कोरोनामुळे अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले असून यामध्ये फ्रंटलाईन वर्कर देखील अपवाद ठरलेले नाहीत. अशाच शहरातील रुग्णवाहिकाचालकाच्या वडीलांचे निधन झाले.
वडीलांवर अंत्यसंस्कार करुन त्यांनी मुलाचे कर्तव्य पार पाडले व तासाभरातच ते पुन्हा आपल्या कर्तव्यावर हजर होत त्यांनी आपली कर्तव्य परायणता जोपासली.
गेल्या 27 वर्षांपासून रुग्णवाहिकेवर चालक म्हणून काम करीत आहे. वडीलांचा मृत्यू झाल्यानंतर जादा पैसे देवून देखील कोणी काम करण्यास तयार नव्हते. रुग्णावाहिकेचा करार करतांना अधिकार्यांकडून विमा काढून देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्यापर्यंत कोणीच पुढाकार घेत नसल्याने अधिकारी केवळ त्यांचे काम काढून घेत आहे.
चंद्रकांत पाटील, रुग्णवाहिका चालक
देशातील फ्रंटलाईन वर्करसह आरोग्य विभागातील कर्मचारी दिवसरात्र आपले कर्तव्य बजावित रुग्णांवर उपचार करीत आहे. करोनाबाधित रुग्णाला उपचारासाठी घेवून जाण्यापासून ते अंत्यसंस्काराची जबाबदारी रुग्णावाहिका चालक गेल्या सव्वावर्षापासून पार पाडत आहे.
असेच शहरातील रुग्णवाहिका चालक चंदक्रांत संतोष पाटील हे कोरोनाकाळात अविरतपणे दिवसरात्र कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी दाखल करीत आहे.
परंतु गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या वडीलांचे निधन झाले. एकीकडे रुग्णवाहिकेची जबाबदारी घेण्यास कोणीच होकार देत नव्हता तर दुसरीकडे वडीलांचा मृतदेह घरात होता. अशा परिस्थितीत सर्व दु:ख बाजूला सारत चंद्रकांत पाटील यांनी वडीलांवर अंत्यसंस्कार करीत आपली मुलाची जबाबदारी पार पाडली.
मात्र अवघ्या तासाभरातच त्यांनी अंत्यविधीची कार्यक्रम आटोपत ते पुन्हा आपल्या कर्तव्यवार हजर होत एक कर्तव्यदक्ष कर्मचार्याची भूमिका बजाविली.
करोनाबाधित रुग्णांना घेवून जाण्यासाठी अनेक जणांकडून नकार दिला जातो. परंतु अशा परिस्थितीत चंद्रकांत पाटील हे गेल्या सव्वावर्षांपासून आपले कर्तव्य बजावित आहे. अशातच ते गेल्या काही दिवसांपासून आता कोरोनाबाधित रुग्णांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घेवून जात असून ही जबाबदारी देखील ते आता पार पाडत आहे. अशा परिस्थितीत बाधित रुग्णाचे नातेवाईक मृतदेहाला हात देखील लावत नसून तो घेण्यास नकार देत असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे.
विमा कवचचे फक्त आश्वासन
जिल्हा प्रशासनाने शहरातील अनेक खासगी रुग्णवाहिका चालकांसोबत करार करुन ते कोरोनाच्या काळात कामकाज करीत आहे. देशात सर्वच फ्रंटलाईन वर्कर्सना शासनाकडून विमाकवच दिले जात आहे. परंतु रुग्णवाहिका चालकांना करार करतेवेळी परिवहन अधिकार्यांकडून केवळ विमाकवचाचे आश्वासन देत त्यांच्याकडून काम करुन घेतले जात आहे. त्यामुळे रुग्णवाहिका चालकांना देखील प्रशासनाने विमाकवच द्यावे, अशी रास्त मागणी त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांकडून केली जात आहे.