नाशिक | प्रतिनिधी
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. अनेक ठिकाणी शाळा, महाविद्यालये पुन्हा बंद केली आहेत. मात्र, पालकांनी दहावी-बारावीच्या परीक्षेबाबत मनात कोणताही संभ्रम ठेवू नये. बोर्डाच्या परीक्षा नियमितपणे आणि ऑफलाइन पद्धतीनेच होतील, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्ट केले….
दोन महिन्यांनी बोर्डाची लेखी परीक्षा (बारावीची) सुरू होणार असून त्यादृष्टीने राज्य मंडळ तयारी करत आहे. करोनाच्या प्रादुर्भावाचा फटका या परीक्षेवर बसेल, असे गृहित धरण्याची आवश्यकता नाही.
यापूर्वीही कोरोनाच्या संकटकाळात मंडळाने दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा (फेरपरीक्षा) ऑफलाइन पद्धतीने घेतलेली आहे. त्यामुळे एप्रिल-मे महिन्यात होणारी नियमित परीक्षा ऑफलाइनच होईल, असे मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
दरवर्षी जवळपास ३० लाख विद्यार्थी दहावी-बारावी बोर्डाची परीक्षा देतात. यंदाही सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाइनच होणार आहे. मुळातच दहावीची परीक्षा ही माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा, तर बारावीची उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा असते.
त्यामुळे ही परीक्षा ‘ऑनलाइन’ घेणे अशक्य आहे. तसेच बोर्डाची परीक्षा ऑनलाइन घेण्याचा राज्य मंडळाचा कोणताही विचार नाही, असे त्यांनी सांगितले.
आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेसाठी नोंदणी झालेले विद्यार्थी
दहावी : सुमारे १६ लाख ४२ हजार
बारावी : सुमारे १२ लाख ७३ हजार