अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
महाविद्यालयात शिवजयंती साजरी करू देणार नाही, असे म्हणत तीन चार विद्यार्थ्यांना दुसर्या समुदायातील समाजकंटक 20 ते 30 युवकांनी मारहाण केल्याची घटना गुरूवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास नगर महाविद्यालयात घडली. या प्रकरणी करण संदीप पाटील (वय 19, रा. लकारगल्ली, भिंगार) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी करण व त्याचे मित्र दीपक बाबासाहेब वाघ, अभिषेक मुळे, अक्षय जमादार, केविन त्रिभुवन हे 19 फेब्रुवारीला महाविद्यालयात शिवजयंती साजरी करण्याबाबत महाविद्यालय प्रशासनाची परवानगी घेण्यासाठी प्राचार्यांकडे जात होते. महाविद्यालय परिसरातून पायी जात असताना दुसर्या समाजाच्या 20 ते 30 युवकांनी त्यांना ‘येथे गर्दी का करता, आम्ही कॉलेजमध्ये शिवजयंती साजरी करू देणार नाही, असे म्हणत शिवीगाळ करुन लाथाबुक्क्याने मारहाण करून निघून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी घडलेली घटना सीसीटिव्हीमध्ये कैद झाली आहे. पोलिसांनी फुटेज ताब्यात घेतले असून, आरोपींचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, मकर संक्रांतिच्या दिवशी नगर शहरात दोन समाजाच्या गटात दगडफेक झाली होती.
त्यावरून मोठ्या प्रमाणावर आरोप प्रत्यारोप झाले. त्यामुळे शहरात आधीच तणावाचे वातावरण असताना महाविद्यालयात दोन समाजाच्या गटात पुन्हा वाद उफाळून आला आहे. त्यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.