Friday, April 26, 2024
Homeनगरकृषी सेवा केंद्रांना अतिरिक्त वेळ वाढवून द्यावा

कृषी सेवा केंद्रांना अतिरिक्त वेळ वाढवून द्यावा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत दिशानिर्देश जारी केलेले आहेत. जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्र आस्थापनांना अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट करून सकाळी सात ते अकरा या वेळेत सेवा पुरविण्यास सांगितली गेली आहे. मात्र, खरिपातील पेरणीची लगबग लक्षात घेता ही वेळ कमी असल्याने शेतकर्‍यांची बियाणे खरेदीसाठी गर्दी होऊ शकते. यामुळे जिल्ह्यातील कृषी केंद्रांना वेळ वाढवून मिळावी, अशी मागणी खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली आहे.

- Advertisement -

मान्सूनच्या पावसाची यंदा चांगली अपेक्षा असताना खताच्या तसेच बियाण्यांच्या बाबतीत शेतकर्‍यांना अडचण निर्माण होता कामा नये. कृषी सेवा केंद्र चालकांना विविध प्रकारच्या नोंदी कराव्या लागत असल्याने व या सर्व नोंदी ऑनलाईन असल्याने वेळ जात आहे. साधारणपणे एका शेतकर्‍यास बियाणे व खते देण्यासाठी किमान दहा ते पंधरा मिनिटांचा अवधी लागतो. कृषी निविष्ठा सर्व शेतकर्‍यांना निर्धारीत वेळेत मिळणे कठीण होते. त्यामुळे शेतकर्‍यांची ही अडचण लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांनी कृषी सेवा केंद्रांना राज्य सरकारच्या निर्देशाप्रमाणे सायंकाळी सात वाजेपर्यंत वाढीव वेळ द्यावा, अशी मागणी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली आहे.

याबाबत खा. डॉ. विखे पाटील म्हणाले, करोनाने आधीच हैराण झालेल्या शेतकर्‍याला जर कृषी निविष्ठा वेळेत व मुबलक प्रमाणात मिळाल्या नाही तर दलालकडून नागवला जाण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने मान्सूनबाबत दिलेले उत्साहवर्धक बातमीनंतर पेरणीसाठी योग्य बियाणे व खते शेतकर्‍यांना मुबलक उपलब्ध व्हावेत, व त्यासाठी काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्याची आवश्यकता आहे. वेळ वाढल्यामुळे गर्दी होणार नाही. तसेच शेतकर्‍यांना मुबलक प्रमाणात बियाणे आणि खते मिळतील, असा विश्वास खा.डॉ. विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या