Wednesday, April 24, 2024
Homeनगरकरोनाला रोखण्यासाठी प्रशासन सतर्क

करोनाला रोखण्यासाठी प्रशासन सतर्क

पाथर्डी (तालुका प्रतिनिधी)-

पाथर्डी तालुक्यात जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या आदेशाने संपूर्ण प्रशासन तालुक्यात कार्यरत झाले

- Advertisement -

आहेत. दरम्यान सोमवारी सायंकाळी तहसील कार्यालयात प्रांताधिकारी देवदत्त केकान, तहसीलदार श्याम वाडकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भगवान दराडे, गटविकास अधिकारी शितल खिंडे, आगार प्रमुख महेश कासार, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अशोक कराळे आदींच्या उपस्थितीत विविध व्यापारी संघटना प्रतिनिधी, स्वयंसेवक संस्था, वैद्यकीय संघटना औषध विक्रेते संघटनांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठक पार पडली.

करोना साथ रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली रात्री 10 पासून पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक रणजीत डेरे यांनी दिली. याबाबत माहिती देताना पो. निरिक्षक डेरे म्हणाले, महसूल, पोलीस, पालिका, आरोग्य व पंचायत समिती अशा सर्व यंत्रणा संयुक्तपणे कार्यरत झाल्या आहेत. नागरिकांनी मास्क वापरणे अनिवार्य असून लग्न सोहळे, दशक्रियासाठी शासनाने निर्धारित केलेल्या संख्येपेक्षा जास्त उपस्थिती तपासणी दरम्यान आढळली तर तत्काळ गुन्हा दाखल केला जाईल. यात्रा, सार्वजनिक कार्यक्रम, सभा, आंदोलने, सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मिक मेळावे कार्यक्रमांना पूर्णपणे बंदी राहील. विनाकारण सार्वजनिक ठिकाणी वावरणे, मास्कचा वापर टाळणे, रस्त्यावर गर्दी करणे अशा वर्तनावर नजर ठेवण्यासाठी शहरात विविध पथके तैनात केले जाऊन विविध चौकांसह जिल्हा हद्दीवर तपासणी नाके सुरू केले जातील.

अत्यावश्यक कामाशिवाय कोणी प्रवास करू नये, बाहेर गावच्या पाहुण्यांना येण्याचा आग्रह करू नये. प्रत्येक दुकानदार व्यावसायिकांच्या दुकानापुढे सुरक्षित अंतरावर ग्राहक उभा राहील. विक्रेता व ग्राहक दोघांनाही मास्क अनिवार्य असून या दुकानात विना मास्क ग्राहक दिसेल त्या विक्रेत्या विरुद्ध कारवाई होईल, रस्त्यावर थुंकणार्‍या विरुद्ध कारवाई अटळ आहे.

राज्यशासनाने मी जबाबदारची केलेली घोषणा पूर्णपणे अंमलात आणण्यासाठी विशेष कृती कार्यक्रम आखण्यात आला आहे. लॉकडाऊन करण्याची शासनाची इच्छा नाही. मात्र बेजबाबदार वागून जनतेने शिस्त व नियम न पाळल्यास शासनाकडून त्याबाबत निर्णय होऊ शकतो. मास्क न वापरणार्‍या विरुद्ध कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली जाईल. प्रशासनाला बळाचा वापर करायला लावू नये. एस.टी.मध्ये कंडक्टरने मास्कशिवाय प्रवाशांना प्रवेश देऊ नये, अशी सूचना प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांनी केली. यावेळी अभय गांधी, योगेश रासने, दिलीप गटागट, भैय्या इजारे, डॉ. दीपक देशमुख, अशोक मंत्री, रवींद्र वायकर आदी सामाजिक संस्था प्रतिनिधी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या