Friday, April 26, 2024
Homeनाशिकखरीप हंगामासाठी बियाणे, खतांचा मुबलक साठा- कृषी मंत्री भुसे

खरीप हंगामासाठी बियाणे, खतांचा मुबलक साठा- कृषी मंत्री भुसे

नाशिक । प्रतिनिधी

राज्यात खरीप हंगामासाठी आवश्यक बियाणे व खते मुबलक प्रमाणात उपलब्ध असून ५० लाख मेट्रीक टन युरियासाठा शासनातर्फे उपलब्ध करून दिला आहे. जिल्हा आणि तालुका निहाय त्याचे सुक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. कोणत्याही शेतकरी बांधवाला त्याचा तुटवडा भासणार नाही, अशी ग्वाही राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली.

- Advertisement -

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मौजे साप्ते कोणे येथे माजी मुख्यमंत्री कै. वसंराव नाईक यांच्या जयंती निमित्त आयोजित कृषी दिन आणि ‘कृषी संजिवनी सप्ताह ’ शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, आमदार हिरामण खोसकर, जिल्हा परिषद कृषी सभापती संजय बनकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय पडवळ, कृषी उपसंचालक कैलास शिरसाठ, ‘आत्मा’ उपसंचालक हेमंत काळे, उपविभागीय कृषी अधिकारी संजय सुर्यवंशी, तहसीलदार दीपक गिरासे, तालुका कृषी अधिकारी संदीप वळवी आदी उपस्थित होते.

माजी मुख्यमंत्री कै. वसंराव नाईक यांनी त्यांच्या कार्यकाळात १९७२ साली झालेल्या दुष्काळात त्यांनी शेतकऱ्यांसाठी भरीव कामगिरी केली. त्यामुळे त्यांना हरित क्रांतीचे प्रणेते संबोधले जाते. रोजगार हमी योजनाची सुरवात करून त्यांनी बेरोजगार शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध केला. तसेच अन्नधान्याने संपन्न असलेला महाराष्ट्र हे त्यांचे स्वप्न त्यांनी खरे केले. कसेल त्यांची शेती हा कायदा व फळबाग लागवड योजना त्यांच्या कार्यकाळात सुरू झाल्याचे भुसे यांनी सांगितले.

यंदाच्या वर्षी ‘पिकाची उत्पादकता, गुणवत्ता व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ’ या त्रिसूत्रीचा अवलंब करण्यात येणार असून १ जुलै ते ७ जुलै या दरम्यान होणाऱ्या सप्ताहात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन लोकप्रतिनिधी व कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

यातुन दर्जेदार बियाणे, खतांचा सुयोग्य वापर, आधुनिक औजारांचा वापर करून कमी खर्चात अधिक उत्पादन शेतकऱ्यांना मिळण्यास नक्कीच मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच रोहयो अंतर्गत फळबाग लागवड, कापूस बोंड अळी, मका पीकावरील नविन लष्करी अळी, पौष्टीक तृणधान्य भित्तीपत्रके, जमीन आरोग्य पत्रिका माहिती पुस्तिका, शेतीशाळा वर्ग कार्यपध्दती पुस्तिका, विविध योजना यशोगाथा, कोरोना काळात घ्यावयाची काळजी या प्रचार व प्रसिद्धी साहित्याचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.

कृषी मंत्री भुसे यांच्या हस्ते विमल आचारे, दिनकर कडाळे, सिताबाई मुळाणे, वासंती कांबळे, भास्कर कांबळे, मधुसूधन भारस्कर, विश्वास चव्हाण यांचा रिसोर्स बँक म्हणून प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला. ही रिसोर्स बँक शासनाच्या योजनांचा लाभ घेवून इतर शेतकऱ्यांना प्रेरीत करण्याचे काम करेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

आगामी काळात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी बाळासाहेब ठाकरे स्मार्ट योजनेअंतर्गत शेतमाल, गटशेती, शेतमालाचा साठा, शीतगृह, शेतमालाची वाहतुक याचे सुयोग्य नियोजन करून माल थेट ग्राहकाच्या हाती जाईल. त्र्यंबकेश्वर तालुक्यात गटशेती व फार्मर्स प्रोड्युसर कंपनी यांचे मोठे जाळे उभारण्याचा मानस देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

तालुक्यात कार्यरत असलेली महिला शेतीशाळा या उपक्रमाचे विशेष कौतुक करत आगामी काळात 25 टक्के महिलांचा सहभाग शेतीशाळेत असावा, कारण एक भगिनी मागे एक कुटूंब शिकणार असल्याने प्रगती साधली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात कृषी विभागामध्ये नाशिक कृषी विभागाची कामगिरी भरीव स्वरूपाची असून राज्यात नाशिक विभाग अव्वल असल्याचे सांगत त्यांनी सर्व कृषी अधिकारी, कर्मचारी यांचे कौतुक केले.

बांधावर जात साधला संवाद

तत्पूर्वी भुसे यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. यामध्ये धोंडेगाव येथील काळू बेंडकुळे व त्यांच्या पत्नी चंद्रभागा बेंडकुळे यांच्या घरी आचानक भेट देवून त्यांचे आशिर्वाद घेतले. या जोडप्याच्या रूपात साक्षात विठ्ठल -रखुमाईचे दर्शन घडल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. त्यांनतर किशोर पवार या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन कृषी विभागाच्या मदतीने उभारलेल्या शेडनेटची पाहणी त्यांनी केली. तसेच हिरामण ठाकरे या शेतकऱ्यांने मनरेगा अंतर्गत उभारलेल्या शेततळे व फळबाग याची देखील पाहणी त्यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या