नाशिक। Nashik
शहरात कोरोनाच्या वाढत्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर जनता कर्फ्युची घोषणा सामाजिक संस्थांनी केली होती. यास अनेक संघटनांनी पाठिंबा दर्शवला असला तरी नेहमीप्रमाणेच नाशिककर रस्त्यांवर फिरत असल्याचे चित्र आजही होते.
दरम्यान पोलीसांनी संचार बंदीच्या कडक अंमलबजावणीस सुरूवात केली आहे. परिमंडळ दोनमध्ये एकाच दिवसात दिड हजार बेफिकीर नागरीकांवर पोलीसांनी कारवाई करत 33 लाख 75 हजाराचा 700 दंड वसुल केला. तर आज दिवसभर शहरातील विविध रस्त्यांवर तपासणी तसेच कारवाई सुरू होती. तर विनाकारण फिरणारांची जागेवरच कोरोना चाचणी घेण्याचा धडाका लावला आहे.
जिल्हा तसेच राज्यभरात कोरानाचा वाढता उद्रेक पाहता राज्य शासनाने 15 दिवसांच्या संचार बंदीची घोषणा केली आहे. शुक्रवारी रात्री पासून शहरभर कडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. वाहनांच्या तपासण्यांबरोबरच विनाकारण फिरणार्या तरूणांची चौकशी करून त्यांच्या तातडीने जागीच कोरोना चाचण्या केल्या जात आहे. शहरात येणार्या सर्व मुख्य मार्गावर तसेच अंतर्गत अशा विविध 38 ठिकाणी बॅरेकेंडींग करण्यात आले आहे. यासह शहरातील भाजीपाला मार्केट, बाजारपेठा, वाहतुक तसेच शहरातील गर्दी होणार्या प्रमुख ठिकाणांवर चेकपाँईंट तयार करण्यात आले आहेत.
यासह त्या त्या पोलीस ठाण्याअंतर्गत नागरीकांना ध्वनीक्षेपाद्वारे सातत्याने आवाहन करण्यात येत असून विनाकारण फिरताना आढळल्यास कडक कारवाईचा इशारा देण्यात येत आहे. असे असले तरी अनेक नागरीक विनाकारण भटकताना दिसत आहेत. कोरोना पॉझिटिव्ह वाढण्यात नाशिकचा देशात प्रथम कमांक आला आहे.
हे रोखण्यासाठी अखेर शुक्रवारी रात्री पासून पोलीसांनी कडक कारवाई सुरू केली असून विनामास्क फिरणारे, सामाजिक अंतर न पाळणारे, संचारबंदी नियम तोडणारे, संचार बंदी नियमांचे उल्लंघन करणार्या अस्थापना, सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्या अशांवर धडक कारवाई सुरू आहे.