नाशिक | प्रतिनिधी
अकरावीच्या प्रवेशासाठी नाशिक महानगरपालिका हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये केंद्रिभूत प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू असून, विद्यार्थ्यांना नोंदणी, अर्जात दुरूस्तीसाठी संधी उपलब्ध करून दिली आहे…
बुधवारी (दि.२) सायंकाळी पाच वाजेपर्यंत २३ हजार ३९२ विद्यार्थी दुसऱ्या फेरीच्या प्रक्रियेसाठी पात्र ठरले आहेत. शनिवारी (ता.५) दुसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे, अशी माहिती शिक्षण उपसंचालक कारर्यालयाने दिली आहे. इयत्ता अकरावी प्रवेशाची पहिली फेरी पार पडल्यानंतर सप्टेंबरपासून प्रवेशाची प्रक्रिया स्थगित होती.
या प्रक्रियेला पुन्हा सुरवात केल्यानंतर विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज भरणे, भरलेल्या अर्जात दुरूस्तीची संधी दिलेली होती. पहिल्या फेरीत प्रवेश रद्द केलेल्या, प्रवेश फेटाळलेल्या तसेच प्रथम प्राधान्याचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांनादेखील या प्रक्रियेत सहभागी करून घेतले होते. तर एसईबीसी प्रवर्गातून अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना खुल्या किंवा ईडब्ल्यूएस या प्रवर्गातून अर्ज भरण्याच्या सूचना केल्या होत्या.
महापालिका हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीसाठी २५ हजार २७० जागा उपलब्ध आहेत. यापैकी पहिल्या फेरीत ८ हजार १८० जागांवर प्रवेश दिले आहेत. उर्वरित १७ हजार ०९० जागांसाठी दुसरी फेरी पार पडते आहे.
दुसरी निवड यादी शनिवारी (ता.५) सकाळी अकराला यादी जाहीर केली जाणार आहे. दरम्यान बुधवारी (ता.२) सायंकाळी पाचपर्यंत ३१ हजार ५८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. यापैकी २३ हजार ३९२ विद्यार्थी दुसऱ्या फेरीच्या सहभागासाठी पात्र ठरले आहेत.