Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedजग बंद आहे : कारण वटवाघुळ ?

जग बंद आहे : कारण वटवाघुळ ?

कीटक भक्षी वटवाघळांच्या माध्यमातून रेबीज आणि करोना असे दोन घातक विषाणू आपल्यापर्यंत पोहोचू शकतात. मात्र कोणाच्याही घरी येऊन त्यांनी असे आजार पसरवले असा आजपर्यंत कुठेही पुरावा नाही. मात्र चीनसारखा देश अनेक प्रकारचे कीटक, पक्षी, वटवाघळे, साप, अनेक सस्तन प्राणी, खुलेआम खात असतो. हे खात असताना जंगलातील पकडून आणलेले प्राणी पिंजर्‍यामध्ये ठेवतात आणि त्यांची उपासमार सुरू होते. ते वन्यप्राणी आजारी पडतात. आजारी पडलेल्या या वन्यजीवांवर अनेक प्रकारचे विषाणू त्यांच्यावर हल्ला करतात. असा वन्यजीव ज्यांनी खाल्ला त्याला पहिला करोना झाला आणि तिथून तो जगभर पसरला.

डॉ. महेश गायकवाड, वटवाघुळ अभ्यासक

आपण केलेल्या चुकांची फळे आपल्यालाच भोगावी लागतात. त्याचे जिवंत उदाहरण आहे. म्हणून जगात वटवाघळांना दोष देण्यापेक्षा ज्या माणसाने गुहेतून त्याला बाजारात आणले त्या मानवी वृत्तीला दोष द्यावा लागेल, द्यावाच लागेल.ऐकायला नवल वाटेल, अर्थात मी 2001 पासून किमान साडेसहा हजार वटवाघुळ पकडली आणि पुन्हा निसर्गात सोडली. त्यांच्या जाती शोधल्या. मात्र मला कधी करोना या विषाणूने त्रास दिला नाही. त्याचे कारण मी काळजीपूर्वक त्याचा अभ्यास करीत होतो.

एकदा मी राबर्स केव्ह अर्थात गुहेमध्ये वटवाघळांचा अभ्यास करण्यासाठी गेलो, अर्थात ती एवढी मोठी गुहा माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहत होतो. अगदी दीड ते दोन लाख वटवाघळे असणारी गुहा, एक ते दीड किलोमीटर लांबीची एवढी अफाट गुहेसमोर मी कुठलेही मास्क न वापरता थांबलो. तेवढी मात्र सुरुवातीला चूक झाली आणि मी दहा दिवस खूप आजारी पडलो. अगदी निमोनियापर्यंत जाऊन आलो. आपल्याला ऐकलं तर नवल वाटेल माझे वजन 65 किलो होते ते 37 किलो झाले होते. मात्र प्रतिकारशक्ती खूप चांगली असल्यामुळे मी वाचलो. डॉक्टरांकडून 10 दिवस केले जाणारे उपाय संपले आणि शेवटी मला काटेवाडीजवळ असणार्‍या काजड बोरी गावातील एका वैदूने माझ्या नाकात दोन इंजेक्शन भरतील एवढे लिक्विड सोडलं आणि त्यानंतर माझ्या नाकातून आणि डोळ्यातून पिवळसर पाणी वाहू लागले ते सातत्याने दोन दिवस वाहत होते आणि तिसर्‍या दिवशी मी अर्धी भाकरी खाण्यापासून सुरुवात केली आणि मृत्यूचा दरवाजा ठोठावून बराही झालो. वीस दिवसांनंतर पुन्हा एकदा मी माझ्या संशोधनाकडे वळालो आणि शास्त्रीय पद्धतीने वटवाघळे पकडणे, त्यांना निसर्गात सोडणे, त्यांच्या प्रजाती शोधणे, त्यांच्यापासून होणारे आजार याकडे बारकाईने लक्ष देत मी माझे संशोधन सुरू ठेवले. त्यानंतर मात्र खूप कमी वेळा मी आजारी पडलो. मात्र मला करोना झालेला नव्हता. हे नीट वाचा; नाहीतर काजड बोरीला औषधासाठी लाईन लागेल !

- Advertisement -

जगात वटवाघळांची दहशत किती आहे! तर जग बंद झाले! ते किती दिवस बंद असेल, हे आज तरी कोणीही सांगू शकत नाही. अर्थात बंद होणे याला कारणही माणूसच आहे. कारण वटवाघुळ गुहेतच राहिले असते तर कदाचित आज आपल्यावर ही वेळ आली नसती. मात्र आपल्या असंख्य चुकांमुळे आपण अनेक आजार आपल्यापर्यंत आणले. त्यातलाच हा एक आजार करोना. चिनी माणसाने गुहेतील वटवाघळे बाजारात आणली आणि बाजारातल्या वटवाघळांनी त्यांचे सूक्ष्मजीव करोना, आपल्याला दिले. यात चूक नक्कीच आपलीच आहे. वटवाघळांची नव्हे. हे निमूटपणे कबूल करावेच लागेल. शिवाय आता आपल्या चुकीमुळे किती दिवस आपल्याला आपल्याच घरात बंदिस्त राहावे लागेल, हेही सांगता येणार नाही.

जगभरात वटवाघळांचे मुख्य दोन प्रकार आहेत. त्यात एक फलाहारी वटवाघळे आणि दुसरी कीटकभक्षी. प्रत्येक वटवाघळांचा जगण्याचा नियम वेगळा आहे. जगभरात एक हजारांपेक्षा जास्त जातीची वटवाघळे आढळतात. 20 टक्के फलहारी वटवाघळे आहेत तर 80 टक्के वटवाघळे कीटक भक्षी आहेत. आपण मुख्य मुद्याकडे वळूया. गेल्या वर्षी निपाह व्हायरस आला. त्याच्या अगोदरसुद्धा अनेक प्रकारचे पक्षी व सस्तन प्राणी, सरपटणारे प्राणी यांच्याकडून आपल्यापर्यंत अनेक विषाणू पोहोचलेत. मात्र ते पोहोचण्यामागचा कारण माणूसच आहे. कारण आपण प्रत्येकाच्या अधिवासात जाऊन राहायला लागलो. तिथे मौजमजा करायला लागलो आणि याचा परिणाम आज आपण बघतोय. वटवाघुळ कारण असले तरीही त्याला नष्ट करता येणार नाही आणि ते करूनसुद्धा काहीच उपयोग होणार नाही. कारण प्रत्येक सूक्ष्म जीवाला त्याच्या मित्र प्राण्याबरोबर राहावे लागते आणि निपाह, रेबीज, करोना सूक्ष्मजीव वटवाघळांबरोबर राहतात. अनंत सूक्ष्मजीव असलेली ही पृथ्वी प्रत्येक सूक्ष्मजीवाला जगण्यासाठी विविध प्राण्यांच्या शरीरात जगण्याचा अधिकार हासुद्धा निसर्ग नियमच आहे. यालाच तर सहजीवन म्हणतात. सर्व जीवसृष्टी जगत आहे.

माणूस फक्त एकटा निसर्गाला सोडून राहतोय आणि परिणाम जग बंद. आता आपण जाणून घेऊयात की, फलाहरी वटवाघळांमुळे माणसाला निपाह किंवा रेबीज हा आजार होऊ शकतो. किंबहुना तो गेल्याच वर्षी इंडोनेशियामधील वटवाघळांमुळे जगात पसरण्याचा धोका होता. मात्र वेळीच सावधानता बाळगून जगाने त्यावर मात केली. आपले पूर्वज खूप हुशार होते. कारण रेबीज हा आजार वटवाघळांमुळे वन्यजीवाकडे आणि वन्यजीवांकडून आपल्यापर्यंत पोहोचतो. या गोष्टींची निरीक्षणे करून त्यांनी वटवाघळांकडे दुर्लक्ष करावे असा सल्ला दिला आणि त्यामुळे वटवाघळांकडे भारतात पाहत नाहीत, पकडत नाहीत किंबहुना ती खातही नाहीत.

करोना विषाणूचा प्रसार कीटकभक्षी वटवाघळे करत आहेत, त्यामधील एक र्‍हायनो लोपोहौस या प्रजातीची वटवाघळे खाल्ल्यामुळे हा आजार माणसापर्यंत पोहोचला. मात्र कोणाच्याही घरी येऊन त्यांनी असे आजार पसरलेत असा आजपर्यंत कुठेही लेखी पुरावा नाही. मात्र चीनसारखा देश अनेक प्रकारचे कीटक, पक्षी, वटवाघळे, साप, अनेक सस्तन प्राणी, खुलेआम खातो. हे खात असताना जंगलातील पकडून आणलेले प्राणी पिंजर्‍यामध्ये ठेवतात आणि त्यांची उपासमार सुरू होते. त्यातच ते वन्यप्राणी आजारी पडतात. आजारी पडलेल्या या वन्यजीवांवर अनेक प्रकारचे विषाणू त्यांच्यावर हल्ला करतात. असा वन्यजीव ज्यांनी खाल्ला त्याला पहिला करोना झाला आणि चीनच्या पहिल्या व्यक्तीमुळे आज जगभर पसरला. अर्थात प्रत्येक विषाणूला वाटते की, आपला प्रसार जगभर व्हावा आणि म्हणून रेबीज हा विषाणू एखाद्याच्या शरीरात गेला की तो माणूस फक्त चावण्याचे काम करतो आणि पुढच्या शरीरात कसे जाईल याचाच विचार करतो.

आज करोना विषाणूसुद्धा हाच विचार करीत प्रत्येकाच्या शरीरात प्रवेश करेल. आज तरी असेच वाटतेय.. यावर उपाय एकच करोनाला प्रवेशबंदी करायची असेल तर प्रत्येकाने आपल्या घरात थांबा. विनाकारण त्याला आमंत्रण द्यायला बाधित माणसांकडे जाऊ नका. करोना झाला म्हणजे मरणच आहे असेही नाही. मात्र जे दोन टक्के मरणार आहेत, त्यात आपले नाव नसावे एवढी काळजी प्रत्येकाने घ्यावी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येकाने आपली मानसिक व शारीरिक स्थिती खूप उत्तम ठेवावी. शारीरिक स्थिती उत्तम ठेवायची असेल तर रोजच्या आहारामध्ये जास्त प्रमाणात लिंबू खा. विटामिन सी त्यातून मिळेल. मानसिक आरोग्यासाठी आपल्या कुटुंबासोबत बहुमोल वेळ घालवा.

झाडे, पाखरे, फुलपाखरे, चैत्रपालवी यांची अगदी बारकाईने निरीक्षणे नोंदवा. यातच आपल्या जीवनाचा खरा आनंद आहे. गाव तिथे जंगल, शहर तिथे जंगल हीच भावना प्रत्येक माणसाच्या मनामध्ये रुजवली पाहिजे. जंगल वाढवतानासुद्धा स्थानिक वृक्षसंपदा जोपासणे गरजेचे आहे. अगदी झाडे, झुडपे वेली ही सगळी स्थानिक प्रजातीची असणे अत्यंत गरजेचे आहे. अत्यंत गरीब देश भूतान आज जगात निसर्गसंपदेने श्रीमंत आहे, तिथे जगण्यातील आनंद आणि समाधान जगात सर्वात जास्त आहे. भारत मात्र 137 व्या क्रमांकावर आहे ही वृत्ती आपली बदलणे अत्यंत गरजेचे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या