Wednesday, April 24, 2024
Homeनगरटेम्पोखाली दबल्याने तीन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू

टेम्पोखाली दबल्याने तीन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू

हंगेवाडी परिसरातील घटना

संगमनेर (तालुका प्रतिनिधी) – ओढ्यामध्ये उलटलेल्या टेम्पोखाली दाबले जाऊन तीन मजूर ठार झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील आश्वी परिसरातील हंगेवाडी-ओझर रस्त्यावर काल गुरुवारी दुपारी घडली. या अपघातात ठार झालेले मजूर हे जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील आहेत.

- Advertisement -

मृतांमध्ये शेख परवेज शेख नासीर (वय 21, इस्लामपुरा, जामनेर, जि. जळगाव), शेख जुनेद शेख भिकन (वय 19, बिस्मिल्लानगर, जामनेर, जि. जळगाव), शेख फरहान शेख हरून बागवान (वय 18, तलहानगर, जामनेर, जि. जळगाव) यांचा समावेश आहे. काल गुरुवारी दुपारी नाशिक याठिकाणी असलेल्या एका व्यापार्‍याचा कापूस भरण्यासाठी जामनेर (जि. जळगाव) येथून टेम्पो (क्र. एमएच 18 एम 8619) हिच्यावरील चालक वसीम नजीर शेख हा आश्वी परिसरातील हंगेवाडी या ठिकाणी आला होता. कापूस भरून पुन्हा हा टेम्पो हंगेवाडी -ओझर मार्गे बाभळेश्वर फाट्याकडे जात होता.

त्याच दरम्यान हा टेम्पो हंगेवाडी व ओझर रस्त्यालगत असलेल्या ओढ्याजवळ आला असता चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने टेम्पो थेट ओढ्यामध्ये पलटी झाला. यावेळी ओढ्यामध्ये पाणीही होते. टेम्पोखाली शेख परवेज शेख नासिर, शेख जुनेद शेख भिकन, शेख फरहान शेख हरून हे तिघेजण दबल्याने तिघाही मजुरांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच आजूबाजूच्या नागरिकांनी ओढ्याच्या दिशेने धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. ओढ्यात पाणी असल्याने नागरिकांना मोठा अडथळा निर्माण झाला होता.

नागरिकांनी या तिघांनाही बाहेर काढले व औषधोपचारासाठी रुग्णवाहिकेद्वारे संगमनेरला आणण्यात आले होते. पण उपचारापूर्वीच तिघांचाही मृत्यू झाला होता. हे तिघेही दूरचे असल्याने त्यांची ओळख पटणे अवघड झाले होते. त्यानंतर तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर कुटीर रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यानंतर आश्वीचे पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांच्यासह पोलिसांनी कुटीर रुग्णालयात धाव घेतली. टेम्पोचालक वसीम शेख याची विचारपूस केली.

त्यानंतर त्याने तिघांचीही नावे पोलिसांना सांगितली. त्यानुसार त्याने दिलेल्या माहितीवरून आश्वी पोलिसांनी तिन्ही मृतदेहांचा पंचनामा केला आहे. मृतदेहांचे शवविच्छेदन झाल्यानंतर मृतांच्या नातेवाईकांना माहिती देण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, उबेद शेख, विश्वास मुर्तडक, रिजवान मंत्री, लालू शेख, मुजीब शेख, राजेंद्र सांगळे यांनी मयतांच्या नातेवाईकांना संपर्क साधून माहिती दिली. सदर मृतदेहांवर शवविच्छेदन झाल्यानंतर सदर मृतदेह रुग्णवाहिकेतून जामनेरकडे रवाना करण्यात आले.

मृत परवेज शेख हा एका मेडिकल दुकानात काम करत होता. मात्र बहिणीचे लग्न असल्याने मेडिकल कामाव्यतिरिक्त अधिक काम करुन पैसे मिळवावे. जेणेकरुन लग्नाला हातभार लागेल. या उद्देशाने तो कापूस भरण्यासाठी आला होता. तर फरमान शेख हरुन बागवान हा आईवडिलांना एकुलता एक मुलगा होता. त्याला चार बहिणी आहेत. अत्यंत हलाखीचे कुटुंब त्याचे असून कुटुंबासाठी हातभार लागावा म्हणून तो कापूस भरण्यासाठी आला होता. तर जुनेद शेख हा लाकूडतोड मजूराचा मुलगा आहे. त्याचीही घरची परिस्थिती हलाखीची आहे. या घटनेत जुनेद याचा भाऊ देखील त्याच्यासोबत होता. तो मात्र किरकोळ जखमी झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या