मुंबई | प्रतिनिधी
विजेचा दरमहा १०० युनिटपर्यंत वापर करणाऱ्या ग्राहकांना मोफत वीज देण्यासाठी राज्य सरकार विचाराधीन आहे. याबाबतची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी नुकतीच एका वृत्तपत्राला दिली. ते म्हणाले की, याबाबतचा आराखडा तयार करण्याची सूचना करण्यात आली असून लवकरच याबाबतचा निर्णय होईल.
१०० युनिटपर्यंत ग्राहकांना मोफत वीज दिली जावी यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. आधी याबाबतची पडताळणी केली जाईल त्यांनतर हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे राऊत म्हणाले.
या पार्श्वभूमीवर वीजग्राहक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी नितीन राऊत यांनी चर्चा केली. संपूर्ण राज्यात ५,९२७ कोटी रुपयांच्या वीजदरवाढीचा प्रस्ताव महावितरणने वीज नियामक आयोगाला दिला असल्याचे सांगण्यात येत आहे.
यावर सुनावणीनंतर एमईआरसी निर्णय घेईल आणि तो निर्णय आल्यानंतर सामान्य वीजग्राहकाच्या हितास प्राधान्य देऊ असे आश्वासनदेखील राऊत यांनी दिले आहे.
हा निर्णय झाला तर राज्यातील सर्वात मोठा वर्ग असलेल्या सर्वसामान्यांना हा फायदा मिळणार आहे. त्यामुळे या निर्णयाचे सर्वत्र स्वागत करण्यात येईल असेही सांगितले जात आहे.