राजुरी |वार्ताहर| Rajuri
नुकत्याच पडलेल्या पावसामुळे शेतामध्ये मोठ्या प्रमाणात तन (गवत) वाढले असून सोयाबीन, मका या पिकांमध्ये गवतावर फवारणी करण्यासाठी शेतकर्यांना एकरी 500 रुपये द्यावे लागत असल्याचे चित्र सध्या राजुरी परिसरात पहावयास मिळत आहे. गेल्या 15-20 दिवसांपासून काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडत आहे. यामुळे सोयाबीन, मका, ऊस, घास या पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात तण वाढले आहे.
त्यामुळे गवतावर तणनाशक फवारणी करण्यासाठी शेतकर्यांना तब्बल 500 रुपये एकरा प्रमाणे पैसे मोजावे लागत आहे. त्यामुळे काही युवकांचा सध्या मोठ्या प्रमाणात व्यवसाय सुरू आहे. दोन ते तीन दिवस फवारा मारण्यासाठी वेटिंग करावे लागत आहे. अनेक संकटांना शेतकरी सामोरा जाऊन कोणत्या ना कोणत्या मार्गाने उसनवारीने पैसे घेऊन किंवा बँकेचे कर्ज काढून शेतात अनेक पिके करीत असतात. परंतु त्यांच्या नशिबात अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. अशा या संकटातून बाहेर निघण्यासाठी शेतकर्यांनी करावे तरी काय असाच प्रश्न सध्या अनेक शेतकर्यांना पडला आहे.