Friday, May 3, 2024
Homeनगरशिर्डी मतदारसंघात 170 कुटुंबियांना 3 कोटीच्या अपघात विम्याचा लाभ

शिर्डी मतदारसंघात 170 कुटुंबियांना 3 कोटीच्या अपघात विम्याचा लाभ

लोणी |वार्ताहर| Loni

शिर्डी मतदारसंघातील सुमारे 1 लाख 47 हजार नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेली मोफत अपघात विमा योजना सहा वर्षाची झाली.

- Advertisement -

अखंडीतपणे सुरू असलेल्या या योजनेचा आजपर्यंत 170 कुटूंबियांना 3 कोटी रूपयांचा लाभ मिळाला असून या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना सामाजिक सुरक्षा देणारा शिर्डी मतदारसंघ देश पातळीवरील एकमेव उदाहरण ठरले आहे.

भाजपाचे जेष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखली आणि खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून 2015 साली शिर्डी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी मोफत अपघात विमा योजना सुरू करण्यात आली. जनसेवा फौंडेशन, प्रवरा सहकारी बँक आणि विमा कंपनीच्या संयुक्त विद्यमाने ही योजना प्रायोगिक तत्वावर सुरू झाली.

यासाठी मतदारसंघातील सर्वच नागरिकांच्या विम्याची रक्कम जनसेवा फौंडेशनच्या माध्यमातून भरण्यात आली. याबाबत आवश्यक असलेली अतिशय मोजकी कागदपत्रही नागरिकांडून जमा करून या योजनेत नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग नोंदविण्यात आला. अपघातामध्ये मृत्यू आलेल्या व्यक्तीच्या वारसदारास दोन लाख रूपये आणि अपंगत्व आल्यास दिड लाख रूपयांच्या मदतीचा अंतर्भाव या योजनेत आहे.

तब्बल सहा वर्षे ही योजना अव्याहतपणे सुरू असून आतापर्यंत 170 कुटूंबियांना या योजनेच्या माध्यमातून सुमारे 3 कोटी 33 लाख रूपये मिळवून देण्यात आले असल्याचे आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. मतदारसंघातील नागरिकांसाठी सुरु केलेली योजना सहा वर्षापासून यशस्वीपणे सुरू आहे.

सर्वसामान्य नागरिकांसाठी सामाजिक सुरक्षेचे कवच मिळवून देणारा शिर्डी मतदारसंघ हा देशातील एकमेव आहे, असे सांगतानाच ज्या कुटूंबियांतील व्यक्तीचा अपघातामध्ये मृत्यू झाला किंवा एखाद्या व्यक्तिस अवयव गमवावा लागला अशा नागरिकांसाठी या योजनारुपी मदतीचे सहकार्य करता आल्याचे समाधान विखे पाटील यांनी बोलून दाखविले.

एखाद्या कुटूंबात घडलेल्या दुर्घटनेनंतर केवळ सांत्वनपर भेट देवून आपण दु:ख व्यक्त करतो. परंतु या योजनेच्या माध्यमातून या कुटूंबाला दिलासा देता येत असल्याचे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले. यामुळे इतर विकास कामांबरोबरच नागरिकांच्या सामाजिक सुरक्षिततेचे काम अधोरेखीत होत असल्याचे डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले. हीच योजना आमच्याही तालुक्यात सुरु करावी, अशी मागणी आता होत असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या