तिसर्‍या लाटेची भीती आणि वास्तव

jalgaon-digital
7 Min Read

कोविड-19 चा संसर्ग हळूहळू कमी होत चालल्याने राज्य सरकारने शाळा आणि धार्मिक स्थळे खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि अनेकांकडून तिसर्‍या लाटेच्या भीतीचा मुद्दा मांडला जात आहे. वास्तविक कोविड-19 च्या महामारीमध्ये 80 टक्के जनतेमध्ये प्रतिकारशक्ती आली की हर्ड इम्युनिटी येऊन साथ संपू लागेल, असे मत तज्ज्ञांकडून वारंवार मांडले गेले आहे. जुलैअखेरीस प्रसिद्ध झालेली सिरो सर्वेची आकडेवारी आणि मोठ्या प्रमाणावर झालेले लसीकरण पाहता आता बहुसंख्य लोकांमध्ये प्रतिकारशक्ती विकसित झालेली असल्याने मोठ्या प्रमाणावर तिसरी लाट येण्याची शक्यता अतिधुसर बनली आहे

कोविड-19 च्या प्रसारकाळात दीर्घकाळ बंद राहिलेल्या शाळा आणि इतर सार्वजनिक जागा सुरू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय गरजेचा होता. गेल्या जवळपास दोन वर्षांपासून शाळा बंद ठेवल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होण्याबरोबरच शारीरिक व मानसिक आरोग्य बिघडले आहे. अंगणवाड्या, शाळा बंद केल्याने तिथे मिळणारा शिजवलेला पूरक आहार बंद झाला आहे. घरी कोरडा शिधा दिला जात असला तरी तो मुलांच्याच वाट्याला येईलच याची हमी नसते. त्यामुळे गरीब स्तरातील मुलांमधील कुपोषण वाढलेले दिसून आले आहे. त्यांना व कुटुंबियांना होणारा कोविड-19 चा धोका याच्याशी या सर्व नुकसानीची तुलना करायला हवी.

आयसीएमआरने केलेल्या चौथ्या ‘सिरो सर्वे’च्या जुलैअखेरीस प्रसिद्ध झालेल्या निष्कर्षातून भारतामध्ये सरासरी 67 टक्के जनतेमध्ये कोविड-19 ची लागण होऊन गेली असल्याचे स्पष्ट झाले होते. म्हणजेच या लोकांच्या रक्तामध्ये अँटीबॉडीज तयार झाल्या होत्या. तसेच सहा वर्षांवरील मुलांमध्येही लागणीचे प्रमाण जवळपास तेवढेच आहे. याचाच अर्थ शाळा बंद ठेवूनही शालेय वयोगटातील लागणीचे प्रमाण प्रौढ लोकांइतकेच आहे. कोविड लागणीचे मुलांमध्ये प्रमाण प्रौढ लोकांइतकेच असले आणि 0 ते 14 वयोगटातील मुलांचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण 26 टक्के असले तरी सरकारी आकडेवारीनुसार कोविड-19 ने दगावलेल्या मुलांचे प्रमाण एकूण कोविड मृत्यूंच्या 0.5 टक्केही नाहीये. बहुसंख्य मुलांना कोविड लागणीमुळे कोणताही त्रास होत नाही, लक्षणे दिसत नाहीत. गंभीर कोविड आजाराचे प्रमाणही त्यांच्यात अत्यंत कमीच आहेे. मग शाळा बंद ठेवून होणारे मुलांचे शैक्षणिक, सामाजिक, मानसिक प्रचंड नुकसान लक्षात घेता आता यापुढे शाळा बंद ठेवणे सामाजिक आरोग्य-विज्ञानाशी विसंगत ठरले असते. दुसरीकडे राज्यातच काही भागात योग्य काळजी घेऊन अनेक शाळा यापूर्वीच सुरू झाल्या असून त्यांचा अनुभवही नकारात्मक नाही, याचीही नोंद घ्यायला हवी. पुणे-मुंबईमध्ये अलीकडे झालेल्या सिरो सर्वेमध्ये 80 टक्के लोकांच्या रक्तामध्ये अँटीबॉडीज सापडलेल्या आहेत. म्हणजेच 80 टक्के लोकांमध्ये प्रतिकारशक्ती तयार झालेली आहे.

असे असले तरी राज्यासह देशात सध्या कोविडच्या तिसर्‍या लाटेची शक्यता चर्चिली जात आहे. तिसरी लाट आली तरी ती दुसर्‍या लाटेसारखी मोठी नसेल. कारण दुसर्‍या लाटेच्या आधी फक्त 24 टक्के जनतेमध्ये कोविड लागण झाल्याने कोविडविरोधी प्रतिकारशक्ती आली होती, तर जून-जुलैमध्ये हे प्रमाण 67 टक्क्यांवर पोहोचले होते. आता हा आकडा 70 टक्क्यांपेक्षा जास्त असेल. कारण आजार पसरतो कसा? तर प्रतिकारशक्ती नसलेल्या माणसाच्या शरीरामध्ये विषाणू शिरतात. तिथे त्यांची संख्या वाढते आणि तिथून ते पुढील व्यक्तीच्या शरीरात जातात. पण जेव्हा अशा बहुसंख्य व्यक्तींमध्ये रोगप्रतिकारक शक्ती तयार असेल तर त्यांच्या शरीरात विषाणूंची वाढ होणे, त्यांची नवी पिढी तयार होणे आणि दुसर्‍या लोकांना त्याची लागण होणे ही प्रक्रियाच थांबते.

विषाणूचा प्रसार वेगाने होण्यासाठी किंवा लाट येण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती नसलेला मोठा समाज असणे गरजेचे असते. दुसर्‍या लाटेच्या सुरुवातीला अशी स्थिती होती. पण आता तशी स्थिती नाही. आता लसीकरणामुळे आणि अनेक जणांना कोविड-19 होऊन गेल्यामुळे वेगाने विषाणू संसर्ग होण्याला मर्यादा येणार आहेत. त्यामुळे मोठी तिसरी लाट येण्याची शक्यता आता कमी आहे. लहान मुलांमध्ये कोविडमुळे मल्टिसिस्टीम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम हा गंभीर आजार होऊ शकतो हे खरे आहे, पण अशा मुलांचे प्रमाण अत्यंत कमी आहे. हा धोका टाळण्यासाठी लहानपणापासून होणारा मधुमेह, अतिरिक्त वजन, काही गंभीर आजार-आरोग्यप्रश्न असणार्‍या मुलांना सध्या शाळेत पाठवू नका, असे पालकांना सांगता येईल.

काही जणांनी लहान मुलांची लस आल्यावर त्यांच्यामध्ये वेगाने लसीकरण करून मगच शाळा उघडाव्यात, असे मत मांडले होते. जागतिक आरोग्य संघटना किंवा भारतातील बालआरोग्य तज्ज्ञांची संघटना यांनी मुलांचे लसीकरण होणे, ही शाळा उघडण्याची पूर्वअट ठेवलेली नाही. आयसीएमआरचे प्रमुख बलराम भार्गव यांनी मध्यंतरी शिफारस केली होती की, पूर्वतयारी करून शाळा उघडायला प्राथमिक शाळांपासून सुरुवात करावी. लहान मुलांसाठीची लस येण्यास आणखी काही महिने आहेत. त्याचे पुरेशा प्रमाणात उत्पादन होऊन सर्व मुलांना दोन डोस देण्याचे काम पूर्ण करायला पुढचे काही महिने लागतील. तोपर्यंत शाळा बंद ठेवणे संयुक्तिक ठरणारे नाही. विकसित देशांत शाळा सुरू करण्यापूर्वी मुलांचे लसीकरण ही पूर्वअट ठेवलेली नाही, हेही लक्षात घ्यायला हवे. इंग्लंडमध्ये लहान मुलांसाठी लस वापरायला परवानगी असूनही फक्त 12 ते 17 वयोगटातील विद्यार्थ्यांना ही लस दिली जात आहे. मुळात लहान मुलांना कोविड-19 ची लस द्यावी की नाही याबाबतच तज्ज्ञांचे एकमत नाहीये. बहुसंख्य विकसित देशांनी लॉकडाऊनचे दिवस वगळता बहुतांश वेळा शाळा सुरू ठेवल्या आहेत. शाळा चालवताना घ्यायची काळजी याबद्दल तपशिलात मार्गदर्शिका निरनिराळ्या तज्ज्ञ संस्थांनी दिल्या आहेत. त्यामुळे सुयोग्य मापदंड पाळून आणि पूर्वतयारी करून अंगणवाड्या आणि शाळा लवकरात लवकर सुरू करणे आवश्यकच आहे. तसेच तेथील पूरक आहारही सुरू करायला हवा. शाळा सुरू करताना, चालवताना घ्यावयाच्या काळजीबाबतच्या मार्गदर्शिका सार्वजनिक आरोग्यशास्राच्या आधारे बनवायला हव्यात. उदाहरणार्थ, शाळा सुरू करताना सर्व शिक्षक व इतर कर्मचारी यांचे लसीकरण पूर्ण झालेले असले पाहिजे. शाळा निर्जंतूक करण्याची गरज नाही. कितीही काळजी घेतली तरी एरोसोल या मार्गाने लागण होऊन काही मुलांना कोविड-19 आजार होण्याची शक्यता आहे, पण त्याचे खापर मुख्याध्यापकांवर वा एखाद्या शिक्षकावर फोडून त्यांच्यावर कारवाई करणे हे प्रकारही टाळले पाहिजेत.

वेल्लोर येथील ख्रिस्तियन मेडिकल कॉलेजच्या विषाणूतज्ज्ञ आणि साथरोगतज्ज्ञ गंगादीप कांग यांनीही तिसर्‍या लाटेची शक्यता कमी असल्याचे मत व्यक्त केले आहे. याखेरीज जयप्रकाश मुलिवल यांच्यासारखे विषाणूतज्ज्ञही सांगताहेत की, 80 टक्के लोकांमध्ये रोगप्रतिकार शक्ती विकसित होईल तेव्हा करोना पँडेमिक न राहता एंडॅमिक होईल; म्हणजेच ती साथ राहणार नाही. इतकेच नव्हे तर त्यांनी तिसरी लाट ही आता लोकचर्चेपुरतीच राहील, असेही म्हटले आहे. उर्वरित 20 टक्के लोकांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झालेली नसली तरी त्यांना आपोआप संरक्षण मिळते. सारांश, तिसर्‍या लाटेची भीती बाळगून दैनंदिन व्यवहार आणि व्यापार, उद्योग बंद ठेवून बसण्याची गरज आता संपली आहे. तरीही सर्व काही खुले झाल्यानंतर काही प्रमाणात बाधितांचा आकडा वाढू शकतो हे गृहीत धरून उपाययोजनांच्या पातळीवर तयार राहणे यातच सुज्ञपणा आहे.

आज राज्यात आणि देशात लसीकरणही मोठ्या प्रमाणावर होत आहे. दुसरीकडे जेवढ्या लोकांना या विषाणूची बाधा होते तेवढ्या लोकांमध्ये रोगप्रतिकारशक्तीही तयार होते, हेदेखील लक्षात ठेवले पाहिजे. शेवटी विषाणूची लागण होणे हे एक प्रकारचे नॅचरल इम्युनायजेशनच असते. मात्र त्याची किंमत मोठी चुकवावी लागते. पण शेवटी तो निसर्गचक्राचा एक भाग आहे. नैसर्गिक लागणीतून होणारी प्रतिकारशक्ती आणि लसीकरणातून तयार होणारी प्रतिकारशक्ती या सर्वांचा विचार करता तिसरी लाट येण्याची शक्यता फार कमी आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *