Wednesday, April 24, 2024
Homeजळगावसंगमनेरजवळ जामनेरचे तिघे ठार

संगमनेरजवळ जामनेरचे तिघे ठार

संगमनेर/जामनेर – 

नाल्यामध्ये पलटी झालेल्या टेम्पो खाली दाबले जाऊन तीन मजूर ठार झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील आश्वी परिसरातील हंगेवाडी-ओझर रस्त्यावर गुरुवारी दुपारी घडली. या अपघातात ठार झालेले मजूर हे जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील आहेत.

- Advertisement -

मृतांमध्ये शेख परवेज शेख नासिर (वय 21, इस्लामपुरा, जामनेर, जि. जळगाव), शेख जुनेद शेख भिकन (वय 19, बिस्मील्ला नगर, जामनेर, जि.जळगाव), शेख फरहान शेख हारून बागवान (वय 18, तलहानगर, जामनेर, जि.जळगाव) यांचा समावेश आहे. गुरूवारी दुपारी नाशिक याठिकाणी असलेल्या एका व्यापार्‍याचा कापूस भरण्यासाठी जामनेर (जि. जळगाव) येथून टेम्पो (क्र. एमएच 18 एम 8619) हिच्यावरील चालक वसीम नजीर शेख हा आश्वी परिसरातील हंगेवाडी या ठिकाणी आला होता. कापूस भरून पुन्हा हा टेम्पो हंगेवाडी-ओझर मार्गे बाभळेश्वर फाट्याकडे जात होता. त्याच

दरम्यान हा टेम्पो हंगेवाडी व ओझर रस्त्यालगत असलेल्या नाल्याजवळ आला असता चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने टेम्पो थेट नाल्यामध्ये पलटी झाला.

यावेळी नाल्यामध्ये पाणीही होते. टेम्पोखाली शेख परवेज शेख नासिर, शेख जुनेद शेख भिकन, शेख फरहान शेख हारुन हे तिघेजण दबल्याने तिघाही मजुरांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघाताची माहिती मिळताच आजूबाजूच्या नागरिकांनी नाल्याच्या दिशेने धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. नाल्यात पाणी असल्याने नागरिकांना मोठा अडथळा निर्माण झाला होता.

नागरिकांनी या तिघांनाही बाहेर काढले व औषधोपचारासाठी रूग्णवाहिकेद्वारे संगमनेरला आणण्यात आले होते. पण उपचारापूर्वीच तिघांचाही मृत्यू झाला होता. हे तिघेही दूरचे असल्याने त्यांची ओळख पटणे अवघड झाले होते.

त्यानंतर तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर कुटीर रूग्णालयात आण्यात आले होते. त्यानंतर आश्वीचे पोलीस  निरिक्षक सुधाकर मांडवकर यांच्यासह पोलिसांनी कुटीर रूग्णालयात धाव घेतली. टेम्पोचालक वसीम शेख याची विचारपूस केली. त्यानंतर त्याने तिघांचीही नावे पोलिसांना सांगितली. त्यानुसार त्याने दिलेल्या माहितीवरून आश्वी पोलिसांनी तिन्ही मृतदेहांचा पंचनामा केला आहे.

मृतदेहांचे शवविच्छेदन झाल्यानंतर मयतांच्या नातेवाईकांना माहिती देण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, उबेद शेख, विश्वास मुर्तडक, रिजवान मंत्री, लालू शेख, मुजीब शेख, राजेंद्र सांगळे यांनी मयतांच्या नातेवाईकांना संपर्क साधून माहिती दिली. सदर मृतदेहांवर शवविच्छेदन झाल्यानंतर सदर मृतदेह रुग्णवाहिनीकेतून जामनेरकडे रवाना करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या