अहमदनगर (प्रतिनिधी)- बाजार व्यवस्थेत ग्राहकाला काही महत्त्वाचे अधिकार ग्राहक संरक्षण कायद्याने दिले आहेत. मात्र हक्कासोबत जबाबदारीची जाणीव करून घेत आता ग्राहकाने या व्यवस्थेतील राजा व्हावे, असा सूर चळवळीतील कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
सार्वमत संवाद कट्टा या कार्यक्रमात ‘जागतिक ग्राहक दिन : ग्राहकांचे हक्क आणि जबाबदारी’ या विषयावर ग्राहक संरक्षण चळवळीतील कार्यकर्ते कारभारी गरड, प्रा.अमिता कोहली व डॉ.उमाकांत पुंड यांच्याशी सार्वमतचे कार्यकारी संपादक अनंत पाटील यांनी संवाद साधला.
बाजार व्यवस्थेत ग्राहकाला संरक्षण देण्यात आले आहे. त्याची फसवणूक होवू नये, चुकीच्या वस्तू त्याच्या माथी मारल्या जावू नये यासाठी ग्राहक संरक्षण कायद्याने काही अधिकार दिले आहेत. मात्र अद्याप देशात याबाबत पूर्ण जागृती झालेली नाही. ग्राहकांनी आपल्या अधिकारांचा सुयोग्य वापर करणे आवश्यक आहे. मात्र अनेकांना याबाबत माहितीच नसते. अलिकडे ग्राहक कायद्यात सुधारणा करण्यात आली. त्यात काही महत्तपूर्ण बदल झाले. ऑनलाईन खरेदीतील फसवणूकीविरूद्ध दाद मागण्याचा अधिकारी या सुधारणेमुळे मिळाला. एवढेच नव्हे तर दिशाभूल करणार्या जाहिरातींवर कडक कारवाईचा अंतर्भात त्यात झाला.
आगामी काळात भारतीय बाजारपेठ विस्तारणार आहे. अशा स्थितीत ग्राहकांनी हा कायदा, अधिकार, संरक्षण आणि जबाबदारी याबाबत अधिक सजग झाले पाहिजे, असे मत या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.