Friday, May 3, 2024
Homeनाशिकएटीकेटीच्या विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्याची शिफारस

एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्याची शिफारस

नाशिक । प्रतिनिधी Nashik

एटीकेटीच्या विद्यार्थ्यांनाही सरासरी गुण देऊन उत्तीर्ण करण्याची शिफारस कुलगुरुंच्या समितीने केली आहे. एटीकेटी म्हणजेच अलाऊड टू किप टर्म विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे व गुणदानाचे काय हा प्रश्नही कायम होता. मात्र आता राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून एटीकेटी असलेल्या विद्यार्थ्यांसंदर्भात लवकरच मोठा निर्णय जाहीर होण्याचे संकेत मिळाले आहे.

- Advertisement -

एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना अन्य विद्यार्थ्यांप्रमाणेच सरासरीची पद्धत वापरून उत्तीर्ण करावे, अशी शिफारस कुलगुरुंच्या समितीने केली आहे. ही शिफारस येत्या दोन दिवसांत मंजूर होण्याची शक्यता आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखालील समिती राज्यातील परीक्षांसंदर्भातील शिफारशी करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने नेमली आहे.

या समितीची उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. त्यात पेडणेकर यांनी एटीकेटीच्या विद्यार्थ्यांसंदर्भातील ही शिफारस मांडली. या विद्यार्थ्यांनादेखील त्या-त्या विषयांमध्ये अंतर्गत मूल्यमापन तसेच आधीच्या एकूणच कामगिरीच्या आधारे गुण द्यावेत.

जर विद्यार्थ्याला एखाद्या विषयात उत्तीर्णतेसाठी गुण कमी पडत असतील तर त्याला ग्रेस मार्क द्यावेत, अशी शिफारस कुलगुरुंच्या समितीने केली आहे. यासह अन्य सर्वच विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करून पदवीदान होईल. ज्या विद्यार्थ्यांना श्रेणीसुधार करायची असेल त्यांनी नंतर परिस्थिती सामान्य झाल्यावर परीक्षा द्यावी, अशी शिफारसही या समितीने केली आहे.

पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाला राज्यात सुमारे ९ लाख विद्यार्थी आहेत, त्यांपैकी सुमारे एक तृतीयांश विद्यार्थ्यांना एका किंवा अधिक विषयांमध्ये एटीकेटी आहे. कुलगुरुंच्या समितीची ही शिफारस मंजूर झाल्यास विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या