
मुंबई | Mumbai
काश्मिरातील अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग येथे अतिरेक्यांशी लढताना भारताचे तीन जवान शहीद झाले. नेमक्या त्याच दिवशी जी 20 शिखर परिषदेच्या यशाबद्दल पंतप्रधान मोदींवर (PM Modi) भाजप कार्यालयात जंगी स्वागत करत पुष्पवृष्टी करण्यात आली. याच प्रसंगावर आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाने त्यांच्या मुखपत्रातुन मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे.
शिवसेना (उद्धव ठाकरे गट) ने केंद्र सरकारवर टीका करताना म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी यांच्यावर दिल्लीत काल जोरदार पुष्पवृष्टी करण्यात आली. फुलांचा वर्षाव होत अशताना मोदी भाजप कार्यकर्त्यांना सुहास्य वदनाने हात वगैरै उंचावून अभिवादन करत असल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. मोदींवर फुलांचे सडे उधले जात असताना जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात आपल्या जवानांच्या रक्ताचे सडे पडत होते. लष्कर-ए-तोयबाचे अतिरेकी घुसले व जवानांची त्यांच्याशी चमकम झाली. त्यात भारतीय सैन्याच्या एका कर्नल आणि मेजरसब चार जांबाच अधिकाऱ्यांना हौतात्म्य प्राप्त झाले. कर्नल मनप्रीतसिंह, मेजर आशीष ढोनक आणि डीएसपी हुमायून भट अतिरेक्यांच्या हल्ल्यात वीरगतीस प्राप्त झाले. जम्मू-कश्मीरमधील स्थिती बरी नाही व मोदी सरकार जी-20 च्या यशाने हुरळून आणि विरघळून गेले आहे. जवान अतिरेक्यांशी प्राणपणाने लढत असताना केंद्रीय निवडणूक समितीत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी दिल्लीतील भाजप मुख्यालयात पोहचले. मोदींनी जी-20 चे अफाट यश संपादन केले त्यामुळे त्यांच्यावर धो-धो फुले उधळली गेली. त्यावेळी तेथे गृहमंत्री अमित शहा व संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. कर्नल, मेजर, डीएसपीच्या मृत्यूचे साव या नेत्यांच्या चेहऱ्यावर नव्हते अशी जहरी टीका करण्यात आली आहे.
तसेच जम्मू-कश्मीरातून कलम 370 हटवले असल्याने आता तिकडे सर्व आबादी आबाद होईल असे चित्र केंद्र सरकारने निर्माण केले, पण ते शेवटी खोटेच ठरल्याचे सामनातून म्हणण्यात आले आहे. 370 कलम हटवून साडेचार वर्षे झाली तरी तेथे विधानसभेच्या निवडणुका होऊ शकलेल्या नाहीत. भारतीय जनता पक्षाचा तिथे दारूण पराभव होईल या भयाने निवडणुका होऊ न देणे हा जनतेशी द्रोह असल्याचीही टीका भाजप सरकारवर करण्यात आली आहे. सोबतच एका राज्यपालाच्या भरवशावर जम्मू-कश्मीरसारखे संवेदनशील राज्य चालवता येणार नाही असेही म्हटले आहे. कश्मीरमधील विधानसभा निवडणुकीच्या मुद्द्यानंतर कश्मीरमधील ज्वलंत प्रश्न म्हणजे तेथील पंडित. त्याबाबतही आजच्या सामनामधून आवाज उठवण्यात आला असून, त्यामध्ये म्हटले आहे की, कश्मीर खोऱ्यात हिंदू पंडित समुदायाची घरवापसी होईल व खोऱ्यात आता नवे उद्योगधंदे येतील व रोजगाराच्या संधी वाढतील असे मोदी-शहांकडून तेव्हा सांगितले होते. त्यातले काहीएक प्रत्यक्षात घडलेले नाही. कश्मिरी पंडित आजही बेवारस अवस्थेत निर्वासित छावण्यात जगत असल्याचीही टीका करण्यात आली आहे.