दिल्ली | Delhi
पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम ही चार राज्य आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूक २०२१ मध्ये मतदारांनी कुणाला कौल दिलाय, हे आज स्पष्ट होणार आहे. सकाळी ८.०० वाजल्यापासून मतमोजणीला सुरवात झाली आहे.
पश्चिम बंगालमधील मतमोजणीच्या आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार तृणमूलने स्पष्ट बहुमताकडे वाटचाल करत १९१ जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपनेही अनेक जागांवर मुसंडी मारून आपण सत्तेच्या शर्यतीत असल्याचं दाखवून दिलंय. सध्या तृणमूल १९१ जागांवर आघाडीवर असून भाजप ९६ जागांवर आघाडीवर आहे. त्याचवेळी काँग्रेस आणि डावे यांची आघाडी केवळ ६ जागांवर पुढे आहे.
दरम्यान या कलांनुसार ममता बॅनर्जी यांचे राजकीय सल्लागार प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी ठरतांना दिसत आहे. प्रशांत किशोर यांनी निवडणुकीआधी असा दावा केला होता, की जर भाजपला तीन अंकी जागांवर विजय मिळाला तर मी राजकीय सल्लागाराचं काम सोडेल. अशात आता समोर येत कलांनुसार त्यांचा हा खरा ठरत असल्याचं चित्र आहे.
सलग दोन टर्म सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला यावेळी भाजपने जोरदार लढत दिली. भाजपच्या दिग्गज नेते यावेळी ममता बॅनर्जींविरोधात मैदानात उतरले होते. राज्यात २९४ जागांसाठी २७ मार्च ते २९ एप्रिल या कालावधीत आठ टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात आले. सत्ता स्थापनेसाठी १४८ जागांची आवश्यकता आहे.
दरम्यान, फक्त पश्चिम बंगालच नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या नंदीग्राम मतदारसंघात ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. ममता बॅनर्जी यांना भाजपाचे सुवेंदू अधिकारी कडवी झुंज देत आहेत. चौथ्या फेरीअखेर ममता बॅनर्जी सात हजार मतांनी पिछाडीवर असून सुवेंदू अधिकारी आघाडीवर आहेत. एकीकडे राज्यात तृणमूलला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता असताना दुसरीकडे मात्र ममता बॅनर्जी यांच्यावर पराभवाचं सावट आहे.