
मुंबई | Mumbai
शिवसेनेत (Shivsena) पडलेल्या फुटीनंतर ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुन्हा एकदा आगामी निवडणुकांच्या दृष्टीने जोरदार तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे. देशात 'इंडिया आघाडी'च्या माध्यमातून विरोधीपक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. त्याच धर्तीवर राज्यातही ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे अनेक छोट्या-मोठ्या संघटनांना एकत्र करुन आघाडी उभी करताना दिसत आहेत.अशातच आता उद्धव ठाकरेंनी राज्यातील समाजवादी पक्ष आणि संघटनांना एकत्र करत नवीन युती (Alliance) केली आहे...
मुंबईतील वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये (MIG Club) दोन्ही पक्षांची संयुक्त बैठक आज रविवार (दि.१५) रोजी पार पडली. यावेळी उद्धव ठाकरेंनी समाजवादीसह वेगवेगळ्या २१ पक्षांना सोबत घेऊन पुढची रणनीती आखण्यास सुरुवात केली. शिवसेनेने मुंबई महानगर पालिकेची पहिली निवडणूक १९६८ मध्ये प्रजा समाजवादी पक्षाशी युती करुन लढली होती. त्यानंतर १९७३ मध्ये महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने रिपब्लिकन पक्षाच्या रा.सू. गवई गटाशी आघाडी केली होती. यानंतर आता शिवसेना (उद्धव ठाकरे गटाने) समाजवादी पक्षासोबत युती केली. यावेळी शिवसेना ठाकरे गट आणि समाजवाद जनता युतीच्या वतीने आमदार कपिल पाटील (MLA Kapil Patil) यांनी उद्धव ठाकरे यांचा फुले पगडी, घोंगडी देऊन सत्कार केला.
या संयुक्त बैठकीत बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपसह (BJP)शिंदेंच्या शिवसेनेवर (Shinde Shivsena) निशाणा साधला. यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, "मला विश्वास बसत नाही की समाजवादी लोकांनी मला कुटुंबप्रमुख मानले. मला लाडके माजी मुख्यमंत्री मानले, आज तुम्ही मला फुलेंची पगडी दिली. मी म्हटले मला हातात द्या, डोक्यावर नको, ती झेपण्यासाठी तेवढच डोकं हवं. टोपीखाली काय आहे, काहींना डोकी नसतात २१ संघटना माझ्यासाठी एकत्र आल्या हे माझे भाग्य समजतो. शिवसेनाप्रमुख मला कायम सांगायचे लोकांना तू आवडावे म्हणून खोटे मुखवटे घालू नकोस, असे त्यांनी सांगितले.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, "शिवसेना आणि भाजपची युती तोडण्याचे कारण काय होतं? आता शिवसेना आणि समाजवादी पक्ष एकत्र आल्याने सवाल उपस्थित केले जातील. जर, गुजरातमध्ये (Gujrat) नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पाकिस्तानी खेळांडूवर भाजप फुलांचं वर्षांव करत असेल मग, मी शिवसेना म्हणून समाजवाद्यांशी बोलू शकत नाही का? तुम्हाला गाडण्यासाठी आमच्यातील मतभेद गाडून टाकले आहेत. तुम्हाला काय करायचंय? देशावर प्रेम करणारे मुस्लिमसोबत आले तर पोटात दुखण्याचं कारण काय? असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्ला चढवला.