Wednesday, April 24, 2024
Homeराजकीयपश्चिम बंगाल : तृणमूलचा आणखी एक आमदार भाजपच्या वाटेवर

पश्चिम बंगाल : तृणमूलचा आणखी एक आमदार भाजपच्या वाटेवर

दिल्ली | Delhi

पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. याच दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आणखी एक झटका बसला आहे. तृणमूल काँग्रेसचा आणखी एका आमदाराने तृणमूल काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, शांतीपूरचे आमदार अरिंदम भट्टाचार्य यांनी पक्ष सोडून, भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे. भट्टाचार्य पश्चिम बंगालचे भाजपा प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत भाजपात प्रवेश करणार आहेत. भट्टाचार्य यांनी काँग्रेसच्या तिकीटावर २०१६ मध्ये निवडणूक जिंकली होती व त्याच्या पुढील वर्षीच त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता ते भाजपात प्रवेश करणार आहेत.

दरम्यान, महिन्याभरापूर्वी ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या सुवेंदू अधिकारी यांनी तृणमूल काँग्रेसला सोडचिट्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्यासोबत तृणमूलचे अर्ध्या डझनाहून अधिक नेत्यांनीही कमळ हाती घेतले होते.

ममता बॅनर्जी नंदीग्राममधूनही निवडणूक लढवणार

ज्या नंदीग्राममध्ये भाजपने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला भगदाड पाडलं त्याच ठिकाणी ममता बॅनर्जी विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत. भवानीपूर हा ममता बॅनर्जी यांचा पारंपारिक मतदारसंघ आहे. मात्र त्यांनी नंदीग्राममधून विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी 2016मध्ये तृणमूलच्या तिकिटावर नंदीग्राममधून निवडणूक लढवली होती. मात्र, सुवेंदू अधिकारी यांच्यासह खासदार सुनील मंडल, माजी खासदार दशरथ तिर्की यांच्यासह 10 आमदारांनी गेल्याच महिन्यात भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यातील पाच आमदार तृणमूलचे आहे. तृणमूलमधील हे आजवरचे सर्वात मोठं बंड असल्याचं मानलं जात होतं. खासदार, माजी खासदार आणि आमदारही पक्षाला सोडून गेल्याने नंदीग्राममध्ये तृणमूलच्या वर्चस्वाला मोठा धक्का बसला होता. आगामी विधानसभा निवडणुकीत नंदीग्रामवर भाजपचं वर्चस्व निर्माण होऊ नये म्हणून ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममधून निवडणूक लढवण्याची घोषणा करून भाजपच्या खेळीला छेद देण्याचा प्रयत्न केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या