Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यादर दोन वर्षांनी विश्व मराठी संमेलन भरवणार- मुख्यमंत्री

दर दोन वर्षांनी विश्व मराठी संमेलन भरवणार- मुख्यमंत्री

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

विश्व मराठी संमेलनास राज्य शासन पूर्ण पाठबळ देईल आणि दर दोन वर्षांनी राज्यातील नव्या शहरांमध्ये हे संमेलन भरविण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी येथे केली. मुंबईमध्ये मराठी माणसाला ताठ मानेने जगता आले पाहिजे. मराठी माणूस या मुंबईमधून बाहेर जाता कामा नये. मुंबईतून बाहेर गेलेल्या मराठी माणसालादेखील मुंबईत परत कसे आणता येईल, यासाठी देखील प्रयत्न करण्यात येतील. आज मुंबईतले हे विश्व संमेलन खऱ्या अर्थाने आपल्या मराठी माणसांना एकत्र आणण्याची एक सुरुवात आहे, असेही शिंदे म्हणाले.

- Advertisement -

‘मराठी तितुका मेळवावा’ (Marathi Tituka Melvava )या पहिल्या विश्व मराठी संमेलनाचे आज मुंबई येथील नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडीया, वरळी येथे उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार राहुल शेवाळे, खासदार हेमंत पाटील, आमदार आशिष शेलार, यामिनी जाधव, प्रकाश सुर्वे, मराठी भाषा विभागाच्या प्रधान सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर, मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आदी उपस्थित होते.

जी भाषा सर्वांना जोडते, जी भाषा सर्वांना सामावून घेते आणि जी भाषा जात, धर्म, पंथ पलीकडची माणुसकी शिकवते, माणुसकी जपते, तीच भाषा खऱ्या अर्थाने विश्वाची बनते. हे सर्व गुण आपल्या मराठी भाषेमध्ये अगदी ठासून भरलेले आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा लवकरात लवकर देण्यात यावा, यासाठी केंद्राकडे देखील पाठपुरावा करण्यात येत आहे. मराठी भाषा धोरणाची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, तसेच मराठी साहित्य संमेलनाच्या अनुदानाच्या रकमेमध्ये वाढ करण्यासाठी शासन सकारात्मक आहे, असे शिंदे म्हणाले.

मराठी माणूस आपल्या कर्तृत्वाने आज जगभरामध्ये सगळीकडे यशाची शिखरं गाठतोय आणि जगाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये आपण गेलो तरी मराठी भाषा कानावर पडते. या सर्व मराठी माणसांना एकत्र आणणारा दुवा म्हणून हे विश्व मराठी संमेलन आहे. मराठी भाषा आणि आपले सण, उत्सव जगभरातील मराठी माणसांना एकत्र जोडून ठेवतात, त्यामुळे गणेशोत्सव साजरा केल्याशिवाय आपल्या मराठी बांधवांना चैन पडत नाही. गेल्या दोन अडीच वर्षांमध्ये कोरोनामुळे सगळे कामकाज ठप्प होते. आता सगळे सुरू झाले आहे, सर्व सण आपण आनंदाने एकत्रितपणे साजरे करत आहोत”, असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

मराठी ज्ञानभाषा व्हावी: फडणवीस

उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण आणि ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेचे शिक्षण हे आपल्या मातृभाषेमध्ये होत नाही, तोपर्यंत आमच्या भाषा या वैश्विकभाषा होऊ शकणार नाही. त्यामुळे मराठी ही ज्ञानभाषा होणे आवश्यक आहे”, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन शैक्षणिक धोरणात उच्च शिक्षण राज्याच्या भाषेत तयार करण्याचे सर्व राज्यांना आवाहन केले. महाराष्ट्राने त्यानुसार काम सुरू केले असून त्यात आघाडी घेतली आहे. मराठीला ज्ञानभाषा बनवण्याचे काम राज्य शासन करीत आहे. जगातल्या सर्व मराठी भाषिकांना एकत्रित आणण्याचे काम या संमेलनाच्या माध्यमातून होत आहे. जगातील विविध भाषांतील साहित्य मराठीमध्ये अनुवादित झाले आहे. मात्र, मराठीतील साहित्य हे जगाच्या विविध भाषांत अनुवादित होऊ शकले नाही, अशी खंत फडणवीस यांनी व्यक्त केली.

मुंबईतून मराठी हद्दपार होणार नाही – मंत्री दीपक केसरकर

मुंबई म्हणजे मराठीची राजधानी आहे. येथे मराठी भाषा टिकली पाहिजे. मुंबईतून मराठी हद्दपार होणार नाही, हा शासनाचा निर्धार आहे. मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार वैश्विक स्तरावर होण्यासाठी ‘मराठी तितुका मेळवावा’ या उदात्त हेतूने मराठी भाषा विभागामार्फत मुंबईत विश्व संमेलन आयोजित करण्यात आले आहे, असे मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी सांगितले.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी आम्ही सर्व पुरावे विभागामार्फत केंद्र सरकारकडे सादर करणार आहोत. या संमेलनाच्या माध्यमातून परदेशस्थ मराठी उद्योजकांना प्रोत्साहित करणे, तसेच त्यांच्यापैकी ज्या उद्योजकांना महाराष्ट्रामध्ये उद्योग सुरु करावयाचा असेल किवा भांडवली गुंतवणूक करायची असेल त्या उद्योजकांना योग्य ती शासकीय मदत उपलब्ध करून देण्यासाठी महत्वाचा उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, अशी माहितीही केसरकर यांनी यावेळी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या