मुंबई | Mumbai
राज्यात मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेद (Uorfi Javed) व चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यातील वाकयुद्धाने नव्या वादाला तोंड फोडले आहे. आता यात शिवसेनेच्या (BJP) उपनेत्या सुषमा अंधारे ()(Sushma Andhare) यांनी उडी घेतली आहे.
सुषमा अंधारे यांनी आपल्या फेसबुकवर एक पोस्ट (Facebook Post) शेअर करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे. सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis), बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) आणि केतकी चितळे (Ketaki Chitale) यांचे काही फोटो शेअर करत चित्रा वाघ यांना खोचक सवाल विचारला आहे.
उर्फी जावेदच्या वेशभूषेवर तुमचा आक्षेप असेल तर असाच आक्षेप तुम्ही कंगना राणौत , केतकी चितळे किंवा अमृता फडणवीस यांच्या वेशभूषेवर घेणार का? यांनाही तुम्ही मारहाणीची भाषा वापराल का? असा सवाल सुषमा अंधारेंनी विचारला आहे. त्यांनी फेसबूकवर अमृता फडणवीस यांच्यासह कंगना राणौत आणि केतकी चितळे यांचे अर्धवट कपड्यातील फोटो शेअर करत हा सवाल विचारला आहे. यामध्ये त्यांनी अमृता फडणवीसांचा स्विमिंग पूलमधील एक फोटोही शेअर केला आहे.
नेमकं काय म्हटलंय सुषमा अंधारेंनी?
"सुषमा अंधारे त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाल्या आहेत की, मी साडी नेसते. मला साडी नेसायला आवडते. कारण मला स्वतःला त्यात जास्त कम्फर्टेबल आणि कॉन्फिडंट वाटतं. भारताच्या बाहेर गेल्यानंतरही माझा पेहराव हा बहुतांश साडीच असतो फार फार तर सलवार सूट."
"पण म्हणून इतरांनी माझ्यासारखाच पेहराव करावा असा माझा अट्टाहास अजिबात नसतो. कारण ज्याला ज्या पेहरावांमध्ये कम्फर्टेबल वाटतं तो करतो. किंवा प्रत्येकाची आपापल्या व्यवसाय क्षेत्राची गरज सुद्धा असते. उदाहरणार्थ टेनिस खेळणारी महिला साडी नेसून टेनिस खेळू शकणार नाही. अन् मी शिक्षिका आहे तर माझ्या शिक्षकी पेशाला साजेसा पेहराव माझा असावा इतकच..."
"अंग प्रदर्शन चूक की बरोबर या मुद्द्यावर नंतर कधीतरी बोलूया पण जर पेहराव हा मुद्दा घेऊन एखाद्याला मारण्याची भाषा केली जात असेल तर ती जात धर्म किंवा विचारधारा बघून का केली जावी? उर्फी जावेद सारख्या अल्पसंख्याक समुदायातील महिलेला मारहाण करण्याची भाषा हा अधिकार तुम्हाला कोणी दिला?" असा सवालही त्यांनी केला आहे.
"जर उर्फी जावेदच्या वेशभूषेवरच तुमचे आक्षेप असतील तर असेच आक्षेप तुम्ही कंगना राणावत, केतकी चितळे किंवा अमृता फडणवीस यांच्या वेशभूषेवर घेऊ शकाल का? किंवा त्यांना (म्हणजे केतकी चितळे, कंगना राणावत किंवा अमृता फडणवीसयांना ) मारहाणीची भाषा कराल का?" असे सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
चित्रा वाघ काय म्हणालेल्या ?
सार्वजनिक ठिकाणी असे चाळे आम्ही चालू देणार नाही. टोकाची भूमिका घेऊ, शेवटपर्यंत लढा देऊ, पण उर्फीला धडा शिकवू. तिच्यावर कारवाई करण्यासाठी मी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतलीये. आता तरीही उर्फीचे प्रताप थांबले नाहीत तर तिला दिसेल तिथे थोबडवणार, असं चित्रा वाघ म्हणालेल्या.
शेवटी त्यांनी, नंगटपणा हा कपड्यांपेक्षा विचार आणि भाषेमध्ये जास्त असतो. प्रसिद्धीझोतात, चर्चेत राहण्यासाठी जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्न सोडून किती भरकट जाल…" असा टोला सुषमा अंधारेंनी चित्रा वाघ यांना लगावला आहे.
चित्रा वाघ यांचा पलटवार
सुषमा अंधारेंच्या फेसबूक पोस्टवर आता चित्रा वाघ यांनी ट्वीट करत पलटवार केला आहे. “आपल्या कामाची गरज म्हणून कोणाचा पेहराव तसा असेल, तर तो झाला कामाचा भाग यावर माझा किंवा कोणाचाही आक्षेप असायचं कारण नाही. पण जिथे आपण समाजात वावरतो सार्वजनिक ठिकाणी भर वस्ती आणि रस्त्यावर खुल्या वातावरणात आपला पेहराव व्यवस्थित राखणं हे सामाजिक भान आहे. तो जर राखला जात नसेल तर त्याला नंगट मानसिकता का म्हणू नये? व्यक्तीस्वातंत्र्याचा सन्मान नं राखता, त्याचा अतिरेक करणाऱ्यांना रोखणं, हा ही धर्म नाही का?, लेकी-बाळी तर आपल्या प्रत्येकाच्याच घरी आहे, त्यांच्यासमोर असे आदर्श असावेत का?,” असा सवाल चित्रा वाघ यांनी विचारला आहे.
“स्री शिक्षित व्हाही, सक्षम व्हावी, यासाठी लढा देणाऱ्या सावित्रीमाईंनाही स्वैराचाराला प्रोत्साहन देणाऱ्या अश्या लेकी अभिप्रेत होत्या का?, जिथे समाजस्वास्थ्य महत्वाचं, तिथे राजकारण करण्याची गरज आहे का?, माझं आवाहन आहे की हे असे उपदव्याप रोखण्यासाठी एक होऊ या.. छत्रपतींचा आदर्श, सावित्रीचे संस्कार जपू या.. खऱ्या अर्थानं महिला सक्षमीकरणाचा जागर करू या.. हा विषय वाद अथवा राजकारणाचा नक्कीच नाही. तर सामाजिक स्वास्थ्य जपण्याचा आहे. ही फक्त माझीच नाही तर आपली सगळ्यांचीच जबाबदारी नाही का?,” असं चित्रा वाघ म्हणाल्या.
“व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार कदापी खपवून घेतला जाणार नाहीच. समर्थन करणाऱ्यांच्या डोक्यात प्रकाश पडो एव्हढी सदिच्छा आहे,” असा टोला अप्रत्यक्षपणे चित्रा वाघ यांनी सुषमा अंधारेंना लगावला आहे.