
मुंबई | Mumbai
राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच पेटला असून आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा आंतरवली सराटी येथे बेमुदत उपोषण (Hunger Strike) सुरु केले आहे. आज (०१ नोव्हेंबर) रोजी त्यांच्या उपोषणाचा आठवा दिवस असून आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहेत. त्यामुळे सरकारच्याही हालचाली वाढल्या आहेत.
तर दुसरीकडे राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याआधीच मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवणे गरजेचे असल्याचे मत राजकीय मंडळींकडून व्यक्त केले जात आहे. तसेच सत्ताधारी पक्षातील आमदारही या आंदोलनात उतरल्याने आंदोलनाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर सडकून टीका केली. तर दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) सुप्रिया सुळे यांनी सांभाळून राहण्याचा सल्ला दिला.
यावेळी बोलतांना सुळे म्हणाल्या की, माझी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे (CM) मागणी आहे की तुमच्या गृहमंत्र्यांचा तातडीने राजीनामा घेतला पाहिजे. जालन्याला ज्या अमानुषपद्धतीने महिला आणि मुलांवर लाठीमार केला. कोयता गँग, ड्रग्स माफिया, लिंगायत, धनगर, मराठा, मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार असंवेदनशील आहे. त्यामुळे राज्याच्या गृहमंत्र्यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे, असे त्यांनी म्हटले. तसेच सह्याद्री अतिथीगृहात मंत्रिमंडळ बैठक सुरू होती आणि सत्तेतील आमदार राजभवन येथे जाऊन आंदोलन करत होते. सह्याद्री ते राजभवन यांच्यात फक्त १० मिनिटांचे अंतर आहे. सह्याद्रीवर जाऊन न्याय मागण्यापेक्षा सत्तेत असलेले आमदार राजभवनात जातात याचा अर्थ ट्रिपल इंजिन सरकारवर सत्तेतील आमदारांचाच विश्वास राहिलेला नाही, अशी टीकाही सुप्रिया सुळे यांनी यावेळी केली.
पुढे सुळे म्हणाल्या की, मी गेल्या दोन आठवड्यापासून मागणी करत आहे. सर्वपक्षीय बैठक बोलावा आणि विधानसभा अधिवेशन बोलवण्याची मागणी मी सातत्याने केली आहे. लिंगायत, मराठा, धनगर आणि मुस्लिम आरक्षणावर सर्वात अधिकवेळा बोलणारी मी एकटी खासदार आहे. चार पाच दिवस अधिवेशन होऊ द्या. प्रत्येक आमदाराला बोलण्याची संधी द्या. प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. प्रत्येक आमदाराने (MLA) स्पष्टपणे भूमिका मांडली पाहिजे. लोकप्रतिनिधी सामान्यांचा आवाज म्हणून येत असतो, असेही त्यांनी म्हटले.
तसेच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आमच्या घराबाहेर येऊन म्हणाले होते की, सत्तेत आल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये मराठ्यांना आरक्षण देऊ. जरांगे पाटलांच्या मनाचा मोठेपणा आहे की त्यांनी १० दिवस वाढवून दिले. मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घ्यायला ४० दिवस सरकारला दिले होते. ४० दिवसांची ही मॅजिक फिगर त्यांनी आणली कुठून? त्यामुळे फडणवीस सातत्याने फसवणूक करत आहेत, अशीही टीका सुळेंनी केली. याशिवाय देवेंद्र फडणवीसांनी सर्वांनाच दगाफटका दिला आहे. मनोज जरांगे पाटलांना दिला, राज्यातील महिलांना दिला, मराठा समाज, धनगर, मुस्लिम समाजालाही दगा दिला, असेही सुळे यांनी सांगितले.
तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत (interview) बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र झाले तर त्यांना विधान परिषदेवर पाठवू असे म्हटले होते. त्यावरही सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले. त्या म्हणाले की, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र होणार आहेत हे त्यांना माहिती आहे. आधी त्यांनी उद्धव ठाकरेंना दगा दिला, आता घटकपक्षातील एकनाथ शिंदेंना दगा देत आहेत. त्यामुळे अजित पवार यांना माझी विनंती आहे, कधीतरी एका ताटात आपण जेवलोय म्हणून सांगतेय, भारतीय जुमला पार्टीपासून सावध राहा, त्यांनी एकनाथ शिंदेंना धोका दिला', असा सल्ला सुळेंनी अजित पवारांना दिला.