
मुंबई | Mumbai
देशाला आज नवीन संसद भवन (New Parliament Building) मिळालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. मात्र, एकीकडे हा ऐतिहासिक सोहळा होत असतानाच काँग्रेससह २० विरोधी पक्षांनी त्यावर बहिष्कार टाकला आहे. तर एनडीएच्या २५ पक्षांसह ४ विरोधी पक्ष या सोहळ्याला उपस्थित राहिले आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
संसदेचा इव्हेंट करू नका, ते लोकशाहीतलं आमचं मंदिर आहे. ही लोकशाही आहे, दडपशाही नाही, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधला आहे. माध्यमाशी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. ही लोकशाही आहे, दडपशाही नाही. लोकशाहीमध्ये विरोधक आणि सत्तेतले असे दोन्ही लोक असले पाहिजेत आणि सर्वांचा समन्वय साधूनच देश चालतो.
नऊ वर्षात अनेकदा असं झालं आहे की सरकारमधले महत्त्वाचे मंत्री, त्यांना जेव्हा बिल पास करायचे असतात तेव्हा या देशाच्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्यांनी फोन केलेले आहेत. त्यामुळे असं काही नाही. चर्चा पूर्णपणे त्यांच्या सोयीप्रमाणे, विरोधी पक्ष त्यांना सोयीप्रमाणे लागतो आणि सोयीप्रमाणे तो त्यांच्या कामाचा नसतो. हे दुर्दैवी असून लोकशाहीसाठी घातक आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती या दोघांनाही इतक्या महत्त्वाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलेलं नाही. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष असतात. लोकसभेचे अध्यक्ष या कार्यक्रमाला दिसतायत, पण उपराष्ट्रपती दिसत नाहीयेत. ओम बिर्ला या कार्यक्रमाला उपस्थित आहेत ही चांगली गोष्ट आहे. परंतु यांनी उपराष्ट्रपतींना कार्यक्रमाला बोलावलं नाही. या सरकारने राज्यसभेला हद्दपारच केलं आहे. आपल्या देशात राज्यसभा आहे की नाही? या कार्यक्रमाला उपराष्ट्रपतींना बोलवायला हवं होतं. परंतु हा कार्यक्रम एका व्यक्तिचा आहे की, देशाचा तेच कळत नाही.
या सरकारमधील एखाद्या वरिष्ठ नेत्याने किंवा मंत्र्याने विरोधी पक्षाच्या नेत्यांना एखादा फोन जरी केला असता तर सर्वजण राजीखुशी गेले असते. संविधानाने देश चालतो आणि लोकशाही असेल तर लोकशाहीत विरोधी पक्ष असलाच पाहिजे. संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही तोच आग्रह होता. हे संविधानातही आहे. अशावेळी तर एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला विरोधी पक्ष नसेल तर कार्यक्रम अपूर्ण आहे, असंही त्या म्हणाल्या.
दरम्यान भाजप शिंदे गट युतीमध्ये शिंदे गटाच्या वाट्याला फक्त पाचच जागा येणार असल्याचं वक्तव्य ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलं आहे. याबाबत सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्यांनी बोलणं टाळलं. त्यांच्या संसारात आम्ही लक्ष देत नाही, भाजप आणि त्यांच्यात काय आहे हे त्यांनी बघून घ्यावं. आम्हाला राज्यातील अनेक प्रश्न सोडवायचे आहेत, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.