
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
लोकसभेत केंद्र सरकारवरील अविश्वास ठरावावर चर्चा सुरु आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी निवेदन केले आहे. यात त्यांनी मोदी सरकारवर (Modi Government) सडकून टीका केली आहे...
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, भाजपकडून (BJP) सध्या देशात तत्त्वहीन पॉलिटिक्स सुरु आहे. पार्टी विथ डिफरन्स कुठं गेलं? देशात यूपीए सरकार असतांना मुलभूत गोष्टींच्या किंमतींवर नियंत्रण होते. मात्र आज महागाई गगनाला भिडली आहे. मोदी सरकार शेतकरीविरोधी आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढल्याचे सरकारकडून सांगितले जात आहे, मात्र ते खोटे आहे. कोणत्या शेतकऱ्याचे उत्पन्न वाढले, ते सरकारने स्पष्ट करावे.
त्या पुढे म्हणाल्या की, भाजपने ९ वर्षांमध्ये ९ सरकारं पाडली आहेत. देशात राजकारणाचा स्तर घसरला आहे. जुमलेबाजी सुरु आहे. विकासाच्या नावाने बोंब आहे. नोटबंदीनंतर चलनातील नोटांच्या संख्येत वाढ झाली आहे, मोदी सरकारने कोणतीही आश्वासने पूर्ण केलेली नाहीत, अशी टीका त्यांनी केली आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनबद्दल मला काही बोलायचे नाही. ही चांगली गोष्ट आहे. परंतु गरीबांच्या ट्रेनचं काय? माझ्या मतदारसंघात तीन रेल्वे स्थानके आहेत. परंतु, एकही रेल्वे थांबत नाही. यूपीएचे सरकार असताना दहा-दहा ट्रेन थांबत होत्या. वंदे भारतला माझा विरोध नाही. परंतु, गरीबांच्या ट्रेनकडे सरकारने लक्ष देण्याची गरज असल्याचे यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या.