धुळे – Dhule – प्रतिनिधी :
केंद्राच्या कृषी कायद्यांना विरोध करणारे सुमारे तीन लाख 26 हजार शेतकर्यांचे अर्ज आज प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत सुपूर्द करण्यात आले. तालुक्यातील पदाधिकार्यांनी हे अर्ज श्रेष्ठींकडे सोपविले.
अखिल भारतीय काँग्रेस महासमितीचे अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी व खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महाराष्ट्राचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनानुसार धुळे जिल्ह्यात तीन लाख 26 हजार शेतकर्यांनी कृषी धोरणाला विरोध केला आहे. हे कृषी धोरण तात्काळ रद्द करावे, अशी मागणी महामहीम राष्ट्रपती महोदयांकडे केलेली आहे.
कृषी धोरणाच्या विरोधात शेतकर्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे. याकरिता धुळे जिल्ह्यात आ. कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शामकांत सनेर यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यातील चारही तालुक्यात स्वाक्षरी मोहिम राबविण्यात आली. तसेच धुळे शहरात शहर जिल्हाअध्यक्ष युवराज करनकाळ यांनी ही मोहिम राबविली.
धुळे जिल्ह्यातील स्वाक्षरी केलेले हे अर्ज अखिल भारतीय काँग्रेस महासमितीचे सरचिटणीस तथा महाराष्ट्राचे प्रभारी एस के पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात, राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, अखिल भारतीय महासमितीचे सचिव संदीप दुवा, संपत कुमार, प्रदेश सरचिटणीस मोहन जोशी यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आले.
प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस राहुल माणिक, युवक काँग्रेसचे शिंदखेडा तालुका अध्यक्ष कुलदीप निकम, उपाध्यक्ष वीरेंद्र झालसे, कल्लू पठाण यांनी हे अर्ज बैठकीत सादर केले.