जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :
राज्यात कोरोनाचा हाहाकार सुरु असताना उपाययोजना करण्यात राज्य सरकार शंभर टक्के अपयशी ठरले आहे.
स्वत:चे अपयश झाकण्यासाठी केंद्र सरकारवर आरोप करण्याशिवाय या सरकारला काहीही येत नसल्याचा टोला, माजीमंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांनी लगावला.
जळगाव जिल्ह्यातील कारोनाच्या उपाययोजनांबाबत जिल्हाधिकार्यांशी सोमवारी चर्चा केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
माजी मंत्री महाजन यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने 26 रोजी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची भेट घेऊन कोरोनाच्या उपाययोजनाबाबत चर्चा केली.
आमदार महाजन म्हणाले की, सध्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढत आहे. तसेच मृत्यू दर देखील जास्त आहे.
रुग्णांना बेड मिळण्यासाठी सुद्धा अडचणीहोत असून रेमडेसीवीर सारख्या इंजेक्शनचाही प्रंचड तुटवडा भासत आहे.यामुळे कोरोनाची परिस्थितीत राज्य सरकारला हाताळता आली नाही.
तर राज्य सरकारनेज उच्च न्यायालयात स्थिती हाताबाहेर गेल्याची कबुली दिली असल्याची टीका आमदार महाजन यांनी केली.
जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांना कोणत्याही दर्जेदार सुविधा उपलब्ध नाहीत. अनेक कोविड केअर सेंटर्समध्ये सुविधा नाहीत, बर्याच ठिकाणी तर साधा पंखासुद्धा नाही. असे असताना राज्यातील सत्ताधारी हे मात्र सातत्याने केंद्रसरकारकडे बोट दाखविण्याचे काम करीत आहे.
खरं तर केंद्राने महाराष्ट्राला मदत देण्यात हात आखडता घेतला नाही. राज्याला रेमडेसीवीर इंजेक्शन मिळालेत, ऑक्सीजनसाठी मदत देखील मिळाली असली तरी राज्य सरकार मात्र योग्य नियोजन करता आले नसल्याची तोफ आमदार महाजन यांनी डागली.
यावेळी आमदार राजूमामा भोळे, जि.प.अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, मनपा राजेंद्र घुगेपाटील, समाजकल्याण सभापती जयपाल बोदडे, जि.प.सदस्य नंदकिशोर महाजन, मधुकर काटे, डॉ.राधधेश्याम चौधरी उपस्थित होते.