मुंबई | Mumbai
मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूर येथे रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारीसे (Shashikant Warise) यांचा ६ फेब्रुवारीला अपघात झाला होता. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर वारीसे यांना कोल्हापूरातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता, ७ फेब्रुवारीला त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कारचालक पंढरीनाथ आंबेरकरला अटक करण्यात आली आहे.
पण, हा अपघात नसून घातपात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना पत्र लिहिले आहे. तर, आज माध्यमांशी संवाद साधतानाही त्यांनी अनेक खुलासे केले आहेत.मात्र, त्यापूर्वी त्यांचे एक ट्वीट सध्या चर्चेत आले आहे. यामध्ये त्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला आहे.
“व्यक्ती को कुचल देनेसे विचार नही मरता…पत्रकार शशिकांत वारीसे यांचा खून राजकीय आहे.नाणार परिसरात नेत्यांनी बेनामी जमीन खरेदी मोठ्या प्रमाणात केली आहे.त्या सर्व सावकार आणि जमीनदारांनी मिळून शशिकांत यांचा काटा काढण्यासाठी सुपारी दिली.शशिकांतचा खुनी पंढरीनाथ आंबेरकर कोणाबरोबर?”, असा सवाल संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये केला आहे. या फोटोमध्ये मंत्री उदय सामंत (uday samant) यांच्यासोबत पंढरीनाथ आंबेरकर दिसून येत आहेत.त्यामुळे आता अनेक चर्चा रंगल्या आहेत.
सरकार आणि पोलीस काय झोपा काढतय का? अजित पवारांचा संतप्त सवाल
अजित पवार म्हणाले, कोकण विभागातील एक पत्रकारास ज्याप्रकारे संपवण्याचा आणि जो अपघात दाखवला गेला. यामागे कोण आहे, कोण मास्टरमाईंड आहे हे कळलं पाहिजे. हे सरकार, पोलीस यंत्रणा काय करत आहे? सगळे झोपा काढता आहेत काय? वस्तूस्थिती कळली पाहिजे. लोकांनाही कळेना, जर महत्तवाच्या लोकांच्याबाबत अशा घटना घडायला लागल्या, तर सर्वसामान्य माणासांनी कुणाकडे बघावं? कायदा, सुव्यवस्था कशी या राज्यात राहणार? या सगळ्याच गोष्टीचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो. याचा तपास लागलाच पाहिजे.
याशिवाय, याबद्दल उद्या २७ तारखेपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आम्ही आवाज उठवणार आहोत. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रात अशाप्रकारच्या घटना सातत्याने घडत आहेत आणि हे सरकार आल्यापासून घडत आहेत, हे सरकारचं अपयश आहे. असंही अजित पवारांनी यावेळी म्हटलं.
दरम्यान वारीशे प्रकरणावरून विरोधकांकडून होत असलेल्या आरोप आणि टीकेनंतर राज्य सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. आता या प्रकरणी एसआयटी चौकशी होणार आहे. पत्रकार शशिकांत वारीशे प्रकरणाची चौकशी करण्यासाठी SIT नेमण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस प्रशासनाला दिले आहेत. वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेत ही SIT स्थापन करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पोलिस प्रशासनाला दिले आहेत.