मुंबई | Mumbai
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि विद्यमान शिंदे-फडणवीस सरकारच्या कॅबिनेटमधील आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या एका धाडसी वक्तव्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
'ज्या मैदानावर बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी यांना सुद्धा गर्दी जमवता आली नाही, तिथे सावंत बंधूंनी सात लाखांची गर्दी जमवून दाखवली. असा दावा तानाजी सावंत यांनी केला. मंत्री तानाजी सावंत यांच्या वक्तव्यांवारून आता राजकारण तापण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले तानाजी सावंत?
२०१७मध्ये पंढरपुरात एक सभा आयोजित केली होती. आपला समाज, सोलापुरातील किंवा महाराष्ट्रातील जनतेला माहिती होतं की जे पटांगण आपण सभेसाठी घेतलं होतं, ते स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्याही सभेला पूर्ण भरलं नाही. आमचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याही सभा तिथे झाल्या. पण त्या सभांनाही मैदान भरेपर्यंत गर्दी जमली नाही.
अडवाणीजी यांच्याही सभांना तेवढी गर्दी झाली नाही. ती किमया या पंढरीच्या नगरीत सावंत बंधूंनी २०१७-१८च्या दरम्यान सात लाख लोकांचा मेळावा भरवून करून दाखवली. हा इतिहास आहे. सावंत बंधूंच्या नियोजनामुळेच उद्धव ठाकरेंच्या सभेला गर्दी जमली, असं तानाजी सावंत म्हणाले आहेत.
तसेच सोलापूरच्या पाकमंत्री पदावरुन भाजप आणि शिवसेनेचे आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्यामध्ये वाद निर्माण होण्याचे चिन्ह दिसत आहेत. सोलापूरचे पालकमंत्री पद मागत होतो,परंतु मला धाराशिव आणि परभणीचे पालकमंत्री केले हे माझे दुर्देव असल्याची खंत व्यक्त करत, अजूनही वेळ गेलेली नाही पुन्हा मला सोलापूरचे पालकमंत्री पद मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देतील असा दावा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे. त्यांच्या दाव्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये पालकमंत्री पदावरुन नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.