मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी अध्यक्षपदावरून निवृत्त होणार अशी घोषणा केली आहे. त्यांनी ‘लोक माझा सांगाती’ या आपल्या पुस्तकाच्या सुधारीत आवृत्तीच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात अचानक आपली निवृत्ती जाहीर केली.
यामुळे महाराष्ट्रात राजकारणात मोठी खळबळ उडाली. शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे.
आज शरद पवार यांनी वाय बी सेंटर बाहेर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. शरद पवार म्हणाले, की, असा निर्णय घेण्याआधी सहकार्यांशी चर्चा करणे आवश्यक असते, मात्र मला खात्री होती, तुम्ही मला होय म्हणाले नसता. तुम्हाला विश्वासात घेऊन निर्णय घ्यायची आवश्यकता होती, पण त्यावेळी मी तुम्हाला विश्वासात घेतले नाही. त्यामागे माझा हेतू काय होता? हे मी तुम्हाला सांगितलं आहे.
मी राजीनाम्याचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्राबाहेरून तुमचे अनेक सहकारी येथे आले आहेत. उद्या माझ्याशी त्यांना बोलायचे आहे. उद्या संध्याकाळपर्यंत माझी त्यांच्याबरोबर बैठक होईल. त्यानंतर तुमच्या सगळ्यांची भावना नजरेसमोर ठेऊन आणि बाहेरून आलेल्या सहकार्यांना विश्वासात घेऊन येत्या एक ते दोन दिवसांत अंतिम भूमिका घेऊ. पण ती भूमिका घेताना कार्यकर्त्यांच्या मनातील भावना दुर्लक्षित केली जाणार नाही, एवढंच याठिकाणी सांगतो. दोन दिवसानंतर तुम्हाला असे बसावे लागणार नाही, याची खात्री देतो, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे.