
मुंबई | Mumbai
काल बुधवार (दि.०४ ऑक्टोबर) रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी 'इंडिया टुडेच्या कॉन्क्लेव्ह'मध्ये बोलताना २०१९ मध्ये महाराष्ट्रात (Maharashtra) राष्ट्रपती राजवटीची (President's Rule) कल्पना शरद पवार यांची होती, असे म्हणत मोठा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर आता फडणवीसांच्या गौप्यस्फोटाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी 'इंडिया टुडेच्या कॉन्क्लेव्ह'च्या कार्यक्रमात बोलताना प्रत्युत्तर दिले आहे...
यावेळी शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले की, "आम्ही सत्तेत नव्हतो. भाजप सत्तेत होता. त्यांच्याकडे जास्त आमदार होते. भाजपला (BJP) जास्त जागा मिळाल्या होत्या. राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय त्यांचाच होता. भाजपकडे बहुमत होते, तर त्यांनी मला का विचारलं? भाजपने राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय का घेतला?" असे पवारांनी म्हटले.
तसेच शरद पवारांची पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर चर्चा सुरू होती, असा दावा देखील फडणवीसांनी या कार्यक्रमात बोलतांना केला होता. त्याबद्दल शरद पवारांना विचारले असता ते म्हणाले की, "ही चुकीची माहिती आहे. प्रश्न हाच आहे की, भाजपकडे बहुमत असताना ते माझं का ऐकत होते?" असा उलट प्रश्न करत त्यांनी भाजपला टोला लगावला.
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले होते?
"शिवसेनेने २०१९ मध्ये सरकार स्थापनेसाठी पक्षाला पाठिंबा देण्यास नकार दिला. यामुळे सत्तेवर कोण येणार? असा प्रश्न निर्माण झाला. यावेळी शरद पवारांनी भाजपशी संपर्क साधला आणि राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी आणि भाजपने युती करावी, असे सुचवले. तेव्हा शरद पवारांनीच राज्यात काही काळासाठी राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी सूचना केली होती. जेणेकरून राष्ट्रवादीच्या सहकाऱ्यांना भाजपशी युती करण्याबाबत माहिती मिळू शकेल. मात्र, सर्व वाटाघाटी झाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माघार घेतली," असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.